शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक खलाशी असलेल्या मच्छिमारांनी मासेमारीचा मुहुर्त साधला. मागील काही दिवस पावसाचा जोर कमी होता. मात्र, ऐन हंगामाच्या पहिल्याच दिवशी पावसाचा जोर काही प्रमाणात वाढल्याने केवळ २० टक्केच मासेमारी नौकानी समुद्रात उतरण्याचा निर्णय घेतला. पावसाचा जोर तुलनेत कमी असल्याने समुद्र किनाऱ्यावर पाण्याचा करंट कमी आहे. त्यामुळे काही मच्छिमारांनी किनारी भागात १० वाव परिसरात मासेमारीचा मुहुर्त केला. पहिल्याच दिवशी बांगडा, कोळंबी, सौदाळा अशी मासळी जाळ्यात सापडली. राज्य सरकाने दि. १ जून ते ३१ जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी मासेमारीवर बंदी घातली होती. हा मोसम माशांचा प्रजननकाळ असल्यामुळे मच्छीमारीवर बंदी असते. १ ऑगस्ट रोजी बंदी कालावधी संपुष्टात आला. शुक्रवारी मुहुर्त साधण्याचा काहींनी प्रयत्न केला. ट्रालिंग, गिलनेटद्वारे मासेमारीला सुरवात होते. पर्ससिननेटद्वारे मासेमारीला दि.१ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.
बहुतांश मच्छीमारांची समुद्रात जाण्यासाठी तयारी झालेली नाही. त्यामुळे सर्वात मोठे बंदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरावर तुलनेत शुकशुकाट होता. मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. मात्र हंगामाच्या २ दिवस आधी काही प्रमाणात पावसाचा जोर काही प्रमाणात वाढला. यामुळे तयारी झालेली असताना देखील अनेक नौकानी शुक्रवारी मुहूर्त उद्यावर ढकलला आहे. केवळ २० टक्के नौकानी मासेमारीचा मुहूर्त साधला. यामध्येही ट्रालिंग करणाऱ्यांची संख्या अत्यल्प असून गिलनेटद्वारे मासेमारी करणाऱ्याचा टक्का अधिक आहे. वरवडे येथील काही छोटे मच्छीमार सकाळच्या सत्रात समुद्रात गेले होते. त्यांना कोळंबी, बांगडा, सौदाळा यासारखी मच्छी मिळाली. परंतु छोटे मच्छिमारही खोल समुद्रात जाण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीत. बंपर मच्छिसाठी १५ वावाच्या पुढे जावे लागणार आहे. या कालावधीत अचानक वातावरण बिघडले तर धोका निर्माण होऊ शकतो. मासळी किनाऱ्याकडे सरकण्याची प्रतिक्षा या छोट्या मच्छीमारांना आहे.