जलजीवन मिशनमधील हर घर नल से जल, या अभियानांतर्गत जिल्ह्यातील शंभर टक्के वैयक्तिक आणि नळ जोडणीची प्रक्रिया १०९ गावांमध्ये पूर्ण करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ३ लाख ३४ हजार ३६९ घरगुती नळजोडणी देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील घरगुतीस्तरावर नळजोडणी देण्याचे ७६ टक्के काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला घरगुतीस्तरावर नळाद्वारे नियमित, शुद्ध आणि ५५ लिटर प्रति माणसी पाणी उपलब्ध करण्यासाठी केंद्र शासनाने ‘जलजीवन मिशन’ची सुरुवात केली आहे.
या अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावातील १०० टक्के कुटुंबांना नळजोडणी देऊन शाश्वत पाणीपुरवठा करण्यासह गावातील सर्व शाळा, अंगणवाडी, संस्था, सार्वजनिक ठिकाण यांना नळाद्वारे पाणीपुरवठा करावयाचा आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत जिल्ह्यातील गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्याकडून या अभियानातील कामे वेळेवर पूर्ण व्हावीत, यासाठी नियमितपणे आढावाही सुरू केला आहे. या अंतर्गत जिल्ह्यात १,४७५ पैकी १,३४१ कामांना कार्यादेश देण्यात आलेली आहे.
त्यापैकी ९६५ योजना प्रगतिपथावर आहे, तर २३६ योजनांची कामे १०० टक्के भौतिकदृष्ट्या पूर्ण झाली असून, १०९ गावांना या योजनेंतर्गत १०० टक्के नळजोडणी देण्यात आलेली आहे. मागणी नसलेल्या आणि जीवन प्राधिकरण विभागाकडे वर्ग केल्यामुळे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून १,३५५ योजनांना मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यासाठी सुमारे ९१० कोटी रुपये निधी अपेक्षित आहे.
जिल्ह्यात एकूण घरगुती नळजोडण्या ४ लाख ४९ हजार ६६७ असून ३ लाख ३४ हजार ३६९ जोडण्या पूर्ण झालेल्या आहेत. जिल्ह्यात १ हजार ४७५ योजना असून त्यातील १ हजार ३५५ योजनांना कार्यादेश दिले आहेत. ९६५ योजना प्रगती पथावर असून २३६ योजना भौतिकदृष्ट्या पूर्ण आहेत. यामधील १०९ योजनांची नळजोडणी पूर्ण झाली आहे.