रत्नागिरी शहरामध्ये लहान मुलांना अपहरण करणारी टोळी सक्रीय असल्याच्या अफवा पसरल्याने पालक सुद्धा चिंतेत आले आहेत. परंतु, पोलीस विभागाकडून वारंवार जनजागृती करून देखील सर्वत्र धाकधुकीचे वातावरण निर्माण झाले आहे. आपले पाल्य उशिरा आले तरी, पालकांच्या काळजाचा ठोका चुकत आहे.
शहरातील एका शाळेतून दि. २ सायंकाळी बाहेर पडलेली विद्यार्थिनी रात्री उशिरापर्यंत घरी न पोचल्याने एकच खळबळ उडाली. नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतल्यानंतर पोलिसांसह नातेवाईकांनी देखील शोधाशोध करण्यास सुरूवात केली. सोशल मीडियावरून सर्वत्र विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. परंतु, काही वेळानंतर संबंधित विद्यार्थिनी मालगुंड येथील तिच्या नातेवाईकांकडे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आईसह नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
११ वर्षाची विद्यार्थिनी शहरातील एका हायस्कूलमध्ये सहावीमध्ये शिक्षण घेते. दररोज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर ती एसटी बसने घरी जाते. शनिवारी सायंकाळी शाळेतून बाहेर पडलेली ती रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचली नाही. सात वाजल्यानंतर नातेवाईक मुलीचा शोधा शोध करत होते; परंतु एकाही नातेवाईकाकडे ती नसल्याने नातेवाईकांनी थेट शहर पोलिस ठाणे गाठले. विद्यार्थीनी बेपत्ता झाल्याची तक्रार देण्याचे काम सुरू असताना पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांनी सुमारे शभंरहून अधिक पोलिस कर्मचारी तिच्या शोधासाठी रवाना केले होते.
ती ज्या भागातून बेपत्ता झाल्याचा चर्चा सुरू होती, त्या गाडीतळ परिसरात सर्व दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. गाडीतळ येथील दोन दुकानात ती विद्यार्थिनी गेली होती. तेथून ती पुन्हा पिकअप शेडजवळ आली. मात्र तेथून ती कुठे गेली याचा शोध लागत नव्हता. याशिवाय सोशल मीडियावरून विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याचे वृत्त सर्वत्र पसरले होते. त्यामुळे शहरात चर्चा रंगू लागल्या. याची माहिती मालगुंड येथील ती मुलगी ज्या नातेवाईकांकडे गेली होती, त्यांच्यापर्यंत पोचली. त्यांनी ती आमच्याकडे सुखरूप असल्याचे सांगितल्यानंतर पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला. रात्री उशिरा आईवडीलानी मालगुंड येथून मुलीला ताब्यात घेतले.