सध्या लम्पी स्कीन हा जनावरांमध्ये आढळणारा विषाणूजन्य त्वचारोगाची भीती जनावरांच्या मालकांमध्ये निर्माण झाली आहे. संकरित गायींमध्ये रोगबाधेचे प्रमाण अधिक आढळून येत आहे. सध्या पाऊस आणि उन्हाळा यांच्या लहरीपणामुळे उष्ण व दमट हवामान रोगप्रसार होण्यास अधिक पोषक असते. या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण जरी कमी असले तरी, जनावरांचे विविध स्राव जसे डोळ्यातील पाणी, नाकातील स्राव, लाळ आदींमधून हा विषाणू बाहेर पडून चारा व पाणी दूषित होऊन इतर जनावरांना या रोगाची लागण होऊ शकते.
या रोगाच्या लक्षणामध्ये अंगावर १० ते २० मिमी व्यासाच्या गाठी येतात. सुरुवातीस भरपूर ताप, डोळ्यातून नाकातून चिकट स्राव, चारा-पाणी खाणे कमी अथवा बंद, दूध उत्पादन कमी व काही जनावरात पायावर सूज येणे व लंगडणे यासारखी लक्षणे देखील दिसून येतात. रोगी जनावरे शारीरिक अशक्त होत जातात. त्यांचे दुग्ध उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटते तसेच काहीवेळा गर्भपात होतो व प्रजननक्षमता घटते. पर्यायाने पशुपालकाचे आर्थिक रित्या नुकसान होत आहे.
रत्नागिरी तालुक्यामध्ये सध्या तरी लम्पी स्कीन आजाराचे बाधित पाळीव जनावरे आढळली नसली तरीही प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. आतापर्यंत रत्नागिरी तालुक्यात ९ हजार ९०५ जनावरांना लस दिल्याच पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले. रत्नागिरी तालुक्यातील सर्व पशुपालकांनी त्यांच्या गायवर्ग पशुधनाचे लसीकरण करून घ्यावे. त्यासाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना किंवा पशुसंवर्धन विभागाशी तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे.
या रोगाबाबतचे रोगप्रतिबंधक स्वच्छ लसीकरण २२ सप्टेंबरपासून सुरू केले असून शासनाकडून दोन टप्प्यांमध्ये एकूण १० हजार लस मात्रा उपलब्ध झाल्या असून, त्याचे वाटप सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांना गाय वर्ग पशुधनाच्या आकडेवारीनुसार करण्यात आले आहे.