गणेशोत्सवासाठी कोकणातील चाकरमानी गावी येत आहेत. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या एसटी बससह खासगी वाहनांची प्रवासी वाहतूक हाऊसफुल्ल झाली आहे. त्यात एसटी महामंडळाने तीन हजारहून अधिक जादा गाड्या कोकणात पाठवल्या आहेत. त्यामधून चाकरमानी रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये दाखल झाले आहेत. काही बसेस मंगळवारी (ता. १९) सकाळी रत्नागिरीत दाखल झाल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यामुळे दहा तासांचा प्रवास सोळा तासांवर गेला. कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो.
त्यासाठी नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबई, पुणे भागांत असलेले कोकणवासीय उत्सवकाळात कोकणातील गावी येतात. त्यांच्या प्रवासाची सोय करण्यासाठी मुंबई ते कोकण मार्गावर तीन हजार जादा गाड्या सोडल्या आहेत. यातही निवडणुका जवळ आल्याने काही नेत्यांनी एसटी महामंडळाकडून सातशेवर बस प्रासंगिक करारवर घेतल्या आहेत. त्या गाड्यांतून कोकणवासीयांना मोफत प्रवास देण्यात येत आहे. त्याचे पैसेही संबधित पक्षीय नेत्यांनी एसटीकडे भरले आहेत. त्यामुळे मुंबईतून सांवतवाडीसाठी ६५० रुपये पर्यंतचे तिकीट भाडे एसटी महामंडळाला मिळते. त्यामुळे एसटी महामंडळानेही राज्यभरातील विविध आगारांतील गाड्या कोकणच्या सेवेत सोडल्या आहेत.
प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद – पुण्यातून कोकणात जाणारे अनेकजण आहेत. पुण्यातून सुटलेल्या गाड्या कोल्हापूरमार्गे कोकणात जातात. त्या गाड्यांनाही गर्दी आहे. तर प्रवाशांची वाढती संख्या पाहून खासगी आराम बसही पुणे-पणजी, सावंतवाडी, रत्नागिरी मार्गावर सोडल्या आहेत. त्यालाही प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद आहे.