आगारातील हायटेक बसस्थानकाचे काम गेल्या पाच वर्षापासून रडतखडत सुरू आहे. ठेकेदारांना एकदाही नियमीत बांधकामाचा सुरू सापडलेला नाही. ४ दिवस काम सुरू राहील्यास पुन्हा १५ दिवस काम बंद राहत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे पाच वर्षात फाऊंडेशनच्या वरती बांधकाम झालेले नाही. गेल्या काही दिवसांपासून हे काम ठप्प आहे. या पोरखेळामुळे प्रवासी मात्र पुरते हैराण झाले आहेत. रत्नागिरी, लांजा व चिपळूण या हायटेक बसस्थानकाचे एकाचवेळी काम हाती घेण्यात आले. मात्र गेल्या सहा वर्षे या ना त्या कारणाने ही कामे रखडली आहेत. चिपळूण बसस्थानकाचे काम सातारा येथील ठेकेदारा मार्फत हे काम सुरू आहे.
तत्कालीन पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी या कामांचे धुमधडाक्यात भुमीपूजन केले होते. मात्र त्यानंतर आलेल्या पालकमंत्री व परिवहनमंत्री अनिल परब यांनी या कामाकडे पुरते दुर्लक्ष केले. या हायटेक पद्धतीच्या बसस्थानकासाठी रत्नागिरीला १० कोटी, चिपळूणला ३ कोटी ८० लाख, तर लांजासाठी १ कोटी ५० लाखांचा खर्च आहे. मात्र वाढीव निधी अभावी चिपळूणातील हायटेक बसस्थानकाचे काम अडचणीत आले. प्रत्यक्षात रत्नागिरी बसस्थानकाचे काम ३६ महिन्यांत तर लाजा व चिपळूणातील काम २४ महिन्यात होणे अपेक्षीत होते. मात्र ६ वर्षे उलटली तरी या इमारतीचा पाया देखील उभा राहीला नाही.
पाया भरणीच्या बांधकामाचे लोखंडही गंजून गेले. मुंबई गोवा महामार्गा दरम्यान चिपळूण मध्यवर्ती बसस्थानक केंद्रस्थानी आहे. या ठिकाणी २४ तास एस.टीची सेवा सुरू असते. कार्यशाळा देखील २४ तास सुरू असते. मात्र स्थानकाची इमारत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. पुर्वी जुनी इमारत बरी होती, असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. या इमारतीचे बांधकाम सुरू होण्यासाठी अनेकांनी आंदोलने देखील केली. अॅड. ओवेस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असून त्यावर सुनावणी सुरू आहे.