रत्नागिरी जिल्ह्याला सतत पडणाऱ्या पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. अख्खी रत्नागिरी जलमय झाली आहे. सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली दिसून येत आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील गौतमी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने, पावसमधील सखल भागात पाणी शिरलं होते. काही भागातील शेती देखील पाण्याखाली गेल्याने शेतकरी वर्ग चिंतातूर झालेला आहे. परिणामी गौतमी नदी ओसंडून वाहू लागल्याने, समाधी मार्गावरील सखल भागात पाणी शिरलं.
पावसाने काही तास विश्रांती घेऊन पुन्हा कोसळायला सुरुवात केली आहे. रत्नागिरी शहरी भागातील अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नगरपालिकेच्या नावाने शंखनाद करण्यात येत आहे. रस्त्यांची अपूर्ण कामे, गटारांची उंची कमी त्यामुळे सर्व गटारातील घाण रस्त्यवर येऊन, अनेकांची घरे सखल भागात असल्याने त्यामध्ये पाणी शिरून, सर्वत्र चिखल आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यांवर वाहत असलेले पाणी बघून, नदीच जणू रस्त्यावर उतरल्याचा भास होत आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून, रस्तेच्या रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहनचालक कसरत करत प्रवास करत होते.
ग्रामीण भागातील फुणगूस येथील शास्त्री खाडीने पाण्याची पातळी ओलांडल्याने खाडीपट्यात सर्वत्र पाणीच पाणी होऊन पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली. खाडी जवळ असणाऱ्या गावातील भात शेती पाण्याखाली गेल्याने, शेतकरी शेतीची कामे अर्धवट तशीच सोडून घरी परतले. लावणीसाठी काढून ठेवलेली भाताची रोपं पाण्याच्या जोरदार प्रवाहासोबत शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर वाहून गेलीत. फुणगूस बाजारपेठेमध्ये तीन ते चार फूट पाण्याने उंची गाठल्याने संपूर्ण जनजीवनच विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने पुढील २ दिवस मुसळधार पाउस पडणार असल्याची माहिती दिली आहे.