खेड तालुक्यातील पोसरेखुर्द येथील दरडीच्या दुर्घटनेमध्ये १४ वर्षीय वैष्णव सावंत या मुलाने ९ जणांचे प्राण वाचवल्याची माहिती आता समोर येत आहे. रोहन चव्हाण यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी आज वैष्णव सावंत व कुटुंब यांचे खूप आभार व्यक्त करत म्हटले, वैष्णव तिथे मदतीला होता, म्हणून आम्ही आज जग पाहतोय अन्यथा, आम्हीदेखील जगाचा निरोप घेतला असता. दरडीखाली जाण्यापासून वाचलेली हि माणसे आज ही दवाखान्यात उपचार घेत आहेत, परंतु ते जिवंत राहिले आहेत याचाच विलक्षण आनंद आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. वैष्णवच्या या अचाट धैर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
२२ जुलै रोजी खेड तालुक्यातील पोसरे-बौद्धवाडी येथे वाडीवर दरड कोसळण्याची घटना घडली. यामध्ये १७ जणांचा गाडले गेल्याने मृत्यू ओढवला. डोंगराच्या कडेला वाडीतील अशोक श्रीपत चव्हाण यांचे कुटुंब वास्तव्यास होते. दहा वाजण्याच्या सुमारास कसला तरी आवाज येतोय, म्हणून रोहन चव्हाण हा मुलगा बाहेर आला. पाहतोय तर डोंगर ढासळत, खाली येत होता, हे निदर्शनास आले. तो मदतीसाठी सगळीकडे धावत होता. तोच बौद्धवाडीकडे धावत असताना तिकडे गाळ ढासळताना दिसला. त्याक्षणी काय करावे, हे सुचेनासे झाले, म्हणून तो आपले शेजारी सावंत कुटुंबाकडे मदतीसाठी धावत गेला.
तेंव्हा प्रकाश सावंत, दिलीप सावंत व त्यांचा १४ वर्षाचा मुलगा वैष्णव सावंत घरात होते. ते तिघे तात्काळ चव्हाण यांच्या घराकडे गेले असता, तोपर्यंत त्यांचे अर्धे घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते आणि वरून माती कोसळणे देखील सुरु होते, एवढ्या संकटात सुद्धा १४ वर्षाचा वैष्णव धीराने आत घुसून प्रत्येकाला बाहेर काढत होता.
त्या दरडीखाली मदतीसाठी आलेले त्याचे वडील प्रकाश व चुलते दिलीप हे सुद्धा अडकले होते. घरातील मुले, बायका भीतीने ओरडत, रडत होत्या. त्यांच्या अंगावर पत्रे पडल्याने त्यांना बाहेर पडणे कठीण जात होते. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा न घाबरता, स्वत:च्या जीवाची पर्वा न करता वैष्णवने एकूण ९ माणसांचे प्राण वाचवले.