27.8 C
Ratnagiri
Thursday, July 31, 2025

महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणानेच दोघांचा मृत्यू

तालुक्यातील निवळी शिंदेवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवर महावितरणच्या हलगर्जीपणामुळे...

वकिल असल्याचे सांगून लांज्यात एकाला घातला गंडा

वकील असल्याचे सांगून आसगे मांडवकरवाडी येथील एका...

कुंभार्ली घाटाची अकरा कोटी खर्चुनही दुरवस्थाच…

कुंभार्ली घाटरस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागील दोन वर्षांत ११...
HomeKhedमण्यारने दंश केलेल्या नऊ महिन्यांच्या चिमुकल्याला जीवदान

मण्यारने दंश केलेल्या नऊ महिन्यांच्या चिमुकल्याला जीवदान

बाळाच्या मानेजवळ मण्यारने दंश केल्याने चिंतेचा विषय होता.

मण्यारने दंश केल्याने बेशुद्ध पडलेल्या व त्यामुळे २० दिवस निपचित पडलेल्या नऊ महिन्यांच्या चिमुकल्याला जीवदान देण्याची कामगिरी वालावलकर रुग्णालयाच्या बालरोगतज्ज्ञ आणि त्यांच्या पथकाने केली. चिन्मय जाधव असे त्या बाळाचे नाव आहे. घणसोली (नवी मुंबई) येथे राहणाऱ्या चिन्मय जाधव या नऊ महिन्यांच्या चिमुकल्याला त्याच्या पालकांनी गणपती उत्सवासाठी दुर्गवाडी येथे आणले होते; मात्र ७ सप्टेंबर २०२४ ला मुलाच्या मानेजवळ मण्यारन या अत्यंत विषारी सापाने दंश केला. त्यामुळे ते बाळ बेशुद्ध झाले. श्वासही थांबला आणि त्याच्या हाता-पायामधील ताकद पूर्णपणे गेली.

बाळाला तातडीने डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात आणले. बेशुद्धावस्थेत वालावलकर रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ताबडतोब उपचार सुरू केले. व्हेंटिलेटर लावला पनवेलहून खास मार्गदर्शन करणारे डॉ. महेश मोहिते आणि वालावलकर रुग्णालयाचे डॉ. अनिल कुरणे, डॉ. शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू केले. अनेक दिवस बाळ निपचित होते. शरीराची कोणतीही हालचाल होत नव्हती. जिवंतपणाचे लक्षण म्हणजे डोळ्यांच्या बाहुल्याची हालचाल ती सुद्धा होत नव्हती. बाळाची प्रकृती गंभीर होत होती. भारत सीरमच्या अँटी स्नेक व्हेनमच्या एकूण ३० कुप्या देण्यात आल्या होत्या. तरीही सुधारणा होत नव्हती.

डॉक्टरांनीसुद्धा आशा सोडली; पण दहाव्या दिवशी बाळाने डोळे उघडले. हळूहळू उपचारांना प्रतिसाद देत हात हलवू लागले आणि आपल्या आईलासुद्धा ओळखू लागले. बालरोग विभागातील नर्सिंग स्टाफ आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. गौरी परब, डॉ. प्रचेता गुप्ता, डॉ. मोहित कडू, डॉ. सलोनी शाह, डॉ. पंक्ती मेहता, डॉ. तनीषा सोमकुवर यांनी विशेष सेवा देऊन बाळाचा जीव वाचवला. याबद्दल डेरवण रुग्णालय प्रशासनाचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.

मानेजवळ दंश ही चिंतेची बाब – सर्वसाधारणपणे अॅन्टीव्हेनम (विष प्रतिरोधक) औषधे सुरू केल्यावर रुग्णाचा प्रतिसाद सुरू होतो. मात्र या बाळाचा कोणताच प्रतिसाद नव्हता. ही चिंतेची बाब होती. बाळाच्या मानेजवळ मण्यारने दंश केल्याने चिंतेचा विषय होता. कारण त्याचा प्रभाव लवकर शरीरावर पडतो. दुर्गवाडीसारख्या ग्रामीण भागात मण्यारने दंश केल्यानंतर निपचित पडलेले बाळ रुग्णालयापर्यंत येणे आणि त्यानंतर दहा दिवसांनी डोळे उघडायला लागणे हे त्या बाळाच्या आयुष्याची दोरी बळकट असल्यानेच घडले. अशा बालरुग्णाच्या संदर्भात आणखी काही इन्फेक्शन होणे वा काही गुंतागुंत होणे शक्य असते. मात्र आमच्या वैद्यकीय पथकाने चिकाटी न सोडता पुरेपूर प्रयत्न केले. त्याला दैवाची साथ मिळाली, अशी भावना रुग्णालयाच्या संचालक डॉ. सुवर्णा पाटील यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

Most Popular