रत्नागिरीमध्ये मोकाट गुरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने, त्यामुळे येता जाता वाहतुकीला धोका संभवत आहे. वाहनचालकांची आधीच खड्डे पडलेल्या रस्त्यांवरून जाताना तारांबळ उडते. त्यात हि गुरे रस्ता रोको करून बसलेली असल्याने अजूनच पंचायत ओढवते. अपघाताच्या घटनाही घडण्याच्या शक्यता आहेत.
मागील आठवड्यापासून रत्नागिरी नगर पालिका मोकाट गुरांना पकडून त्यांना पालिकेजवळील एका इमारतीच्या तळघरात डांबून ठेवत आहे. परंतू, ती जागा अतिशय गैरसोयीची असल्याने जनावरांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने पकडलेल्या गुरांना ठेवण्यासाठी जोपर्यंत कोंडवाड्याची व्यवस्था होत नाही, तोपर्यंत रत्नागिरी शहरातील गुरांना पकडू नये, असे निवेदन नगरपालिकेला दिले आहे.
ज्याठिकाणी गुरे डांबून ठेवली जात आहेत, त्याच ठिकाणी सांडपाण्याचा निचरा होतो. डांबून ठेवलेल्या गुरांच्या मलमूत्राने तेथील परिसर अतिशय खराब झाला आहे. सर्वत्र घाण असल्याने डांबून ठेवलेली गुरे दिलेला चारापाणीदेखील खाऊ शकत नाहीत. यामध्येच दोन दिवसांपूर्वी एका गाईचा मृत्यू ओढवला आहे. याला जबाबदार कोण, असा स्पष्ट सवाल श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सदस्यांनी केला आहे.
हिंदू धर्मामध्ये गाईला देवासमान मानले जाते. तिचे पूजन केले जाते. तिच्याकडे गोमाता म्हणून पाहिले जाते, तरीही तिची अवस्था अशाप्रकारे ठेवण्यात आली आहे हे खर्च दुर्दैवी आहे. इतर प्राण्यांच्या तुलनेत गोवंशाकडे दुर्लक्ष केले जात आहे. याचा पुर्नविचार नगरपालिकेने करावा. निसर्गाने सर्वांना जगण्याचा समान अधिकार दिला असून, त्याची जाण सर्वांनी ठेवायला हवी.
त्यामुळे जोपर्यंत मोकाट गुरांसाठी कोंडवाड्याची पर्यायी व्यवस्था होत नाही, तोपर्यंत गुरांना पकडून अशाठिकाणी डांबून ठेवू नये, त्यांच्या जिवाशी खेळू नये, अशी मागणी प्रतिष्ठानने केली आहे. याप्रसंगी सानिकेत वारेकर, सुशील कदम, सचिन नानिवडेकर, चंद्रकांत राऊळ, , गणेश गायकवाड, विष्णु बगाडे, माणिकराव टापरे आदी संस्थेचे सदस्य उपस्थित होते.