स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरदरम्यान होण्याची शक्यता आहे. या निवडणुका कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाच्या आहेत. यापुढील निवडणुका महायुती म्हणून लढवल्या जातील. पार्लमेंटरी बोर्डात जे निर्णय घेतले जातात ते महायुतीच्या नेत्यांना मान्य असतात. त्यामुळे आचारसंहितेनंतरच यावर वरिष्ठ विचार करतील; परंतु प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, अशी स्पष्ट भूमिका भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली. रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या चव्हाण यांनी भाजपच्या कार्यालयात भेट देऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर भाजपच्या रत्नागिरी दक्षिण आणि रत्नागिरी उत्तरच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी माळनाका येथील शासकीय विश्रामगृहावर संवाद साधला. त्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी आमदार विनय नातू, दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे आदी उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, भारतीय जनता पार्टीकडून देशभर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी संघटन पर्व कार्यक्रम सुरू आहे. राज्यात
८० संघटनात्मक जिल्ह्याची रचना करण्यात आली. १ हजार २१४ मंडले तयार करण्याचे काम सुरू आहे. पदाधिकाऱ्यांवर प्राथामिक जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. प्रत्येक पदाधिकाऱ्याकडून कामांची माहिती घेतली जात आहे. विविध उपक्रमांची माहिती त्यावेळी वरिष्ठ पातळीवरून घेण्यात येत आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या कामाचे मूल्यमापन वरिष्ठ पातळीवरून सुरू आहे. २५ जूनपर्यंत महत्त्वाच्या नेमणुका करून मंडल रचना पूर्ण करण्याची प्रक्रिया होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरदरम्यान लागण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी संघटना अधिक मजबूत करण्यासाठी बांधणी सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाच्या आहेत. या निवडणुकांमुळे कार्यकर्त्यांना बळ मिळते. पक्षानी वाढवताना महायुतीत वाद होऊ नयेतोला ही आपली भूमिका आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावरू तोडगा काढत असतात, असेही चव्हाण यांनी सांगितले.
महायुतीने घेतले चांगले निर्णय – मागील काही महिन्यात महायुती म्हणून चांगले काम सुरू आहे. अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेले आहेत. मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्याची गेल्या अनेक वर्षांची मागणी त्यामुळे पूर्ण झाली आहे. नवीन निर्णयांचे नागरिकांनी स्वागत केले पाहिजे, असे चव्हाण म्हणाले.