केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत राजापूर तालुक्यातील ५० गावे ‘हर घर जल’ म्हणून घोषित झाली आहेत. तर सुमारे दीडशे गावे प्रतीक्षेत आहेत. जलजीवन योजनेतील सर्व कामे पूर्ण करण्यावर शासन आणि प्रशासनाचा भर असून, त्या दृष्टीने जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शासनाने या योजनेला मुदतवाढ दिली आहे; मात्र, पुरेसा निधी मिळत नसल्याने सर्व गावे शंभर टक्के हर घर जल करण्यात अडचण निर्माण झाली आहे. घरोघरी नळजोडण्यांद्वारे मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी शासनातर्फे जलजीवन मिशन योजना राबवली जात आहे. ही योजना पूर्ण करण्यासाठी सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदत होती. मात्र निर्धारित कालावधीमध्ये कामे पूर्ण होऊ न शकल्याने मार्च २०२८ अखेर सर्व कामे पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
त्या दृष्टीने प्रशासकीय स्तरावर प्रयत्नही सुरू झाले आहेत. सध्या राजापूर तालुक्यात मंजूर झालेल्या ११२ कोटी रुपये निधीतून २०० महसुली गावांमध्ये कामे सुरू आहेत. त्यातील बहुसंख्य कामे प्रगतिपथावर आहेत; परंतु या योजनेसाठी शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध न झाल्यामुळे कामांचा वेग मंदावला आहे. मुदतवाढीचा फायदा कामे पूर्ण करण्यासाठी होणार असला तरीही वेळेत निधी दिला गेला नाही तर ठेकेदाराकडून कामाचा वेग कायम राहणे अशक्य आहे. याचा विचार करा, अशी मागणी ठेकेदारांकडून केली जात आहे.
हर घर जल घोषित झालेली गावे – शिवणेखुर्द, बुरंबेवाडी, बाकाळे, दसूरवाडी, पोकळेवाडी, चिखलगाव, पाजवेवाडी, निवेली, तेरवण, थोरलीवाडी, साखर, येरडव, गोठीवरे, कारवली, कशेळी-वरचीवाडी, दसूर, कोंभे, सागवे-पालये, खिणगिणी, जैतापूर-बाजारवाडी, सौंदळ-मुसलमानवाडी, नाणार-वाडीचिवारी, कुंभवडे-हरचलेवाडी, कुंभवडे, डोंगर-दत्तवाडी, मठखुर्द, सोलगाव, कुवेशी-तुळसुंदेवाडी, वाडावेत्ये, गोठणेदोनिवडे, वावूळवाडी, बारसू, भाबलेवाडी, निखरेवाडी, कोदवली-मांडवकरवाडी, मोगरे केरावळे, सागवे जांभारी, देवीहसोळ, कोंडसरबुद्रुक, बेनगी, वडदहसोळ-खालचीवाडी, पळसमकरवाडी, करेल, डोंगर-मुसलमानवाडी, परटवली.

