जलजीवन मिशन योजनेतर्गत केलेल्या कामाचे सुमारे दोड कोटी रुपयांचे बिल न मिळाल्याने सांगली येथील एका अभियंता ठेकेदाराने आत्महत्या केल्यानंतर त्या घटनेचे पडसाद कोकणातही उमटले. या घटनेचे चिपळूण तालुक्यातील ठेकेदारही आक्रमक झाले आहेत. तालुक्यातील सर्व पाणीयोजनांची कामे चकीत बिले मिळेपर्यंत थांबवण्यात येतील, असा इशारा ठेकेदारांनी दिला आहे. जलजीवन मिशनच्या ठेकेदारांनी गुरुवारी (ता. २४) सायंकाळी पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता शैलेश बुटाला यांची भेट घेत व्यथा मांडली. दशरथ दाभोळकर, आर. जी. कुलकर्णी, संतोष जाधव, राजेश सुतार, योगेश सुतार, तुषार चव्हाण आदीनी थकीत बिले, आर्थिक अडचणी आणि कामकाजावरील ताण या संदर्भात कैफियत मांडली. आमच्यावर आत्महत्येची वेळ येऊ देऊ नका, असा संतप्त सवाल करत त्यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही बिले न मिळाल्याचा आरोप केला. बँकांकडून काढलेले कर्ज, त्यावरील वाढणारे व्याज आणि प्रशासनाकडून मिळणारी असंवेदनशील वागणूक यामुळे ठेकेदार आर्थिक संकटात सापडले आहेत.
जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात सुमारे १२०० कोटींच्या पाणीपुरवठा योजनांचे काम सुरू आहे. या योजनांच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचवण्याचा केंद्र शासनाचा उद्देश आहे; मात्र गेल्या दीड वर्षात केवळ १५ ते २० टक्के निधी वितरित करण्यात आला असून, उर्वरित देयकांअभावी अनेक कामे अर्धवट पडली आहेत. यामुळे ठेकेदार आर्थिक संकटात सापडले असून, अनेकांची मानसिक आणि कौटुंबिक घडी विस्कटली आहे. सांगलीतील आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण ठेकेदार वर्गात अस्वस्थता निर्माण केली आहे. ज्याच्याकडून काम करून घेतले त्याला वेळेवर पैसे न दिल्यामुळे त्याला जीवन संपवण्याची वेळ आली. आता आम्हालाही तशीच वेळ येणार का? असा सवाल या ठेकेदारांनी उपस्थित केला.