एस. टी महामंडळ कोरोना काळापासून, गेले दीड एक वर्ष काही ठराविक फेऱ्या सोडता, बंद ठेवण्यात आल्या होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव जसजसा कमी होऊ लागला तसा हळूहळू एस. टीच्या फेर्या काही प्रमाणामध्ये वाढविण्यात आल्या आहेत. परंतु, गणपतीमध्ये महामंडळाकडून चाकरमान्यांच्या येण्याजाण्यासाठी सोडण्यात आलेल्या जादा गाड्यांमुळे तोट्यात राहिलेली एस. टी थोडी स्थिरावली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात सोडण्यात आलेल्या जादा गाड्यांमुळे एसटीला २ कोटी ७१ लाख ६५ हजार ६०० रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी महामंडळामार्फत १०२९ जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. आणि सुरक्षित प्रवास म्हणून चाकरमान्यांनी एस. टी ला प्रथम प्राधान्य दिल्याने नक्कीच एस. टीचे सुगीचे दिवस पुन्हा येऊ लागले आहेत.
मागील वर्षीपेक्षा कोरोनाचे प्रमाण या वर्षी आटोक्यात आल्याने, शासनाने गावी जाण्यासाठी असलेल्या निर्बांधामध्ये शिथिलता आणली होती. त्यामुळे शासकीय निर्बंध शिथिल करण्यात आल्याने मोठ्या संख्येने चाकरमानी आपल्या गावी आले होते. जिल्ह्यात साधारण १ लाख ९१६ च्या दरम्यान चाकरमानी दाखल झाले होते. यामध्ये रेल्वेद्वारे ३१०९०, खाजगी वाहनातून २२,२९९ आणि एस.टी द्वारे २४८५८, आराम बसने २२६६९ चाकरमानी दाखल झाले होते. तसेच मुंबईमधून गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात ११०० एसटी गाड्या दाखल झाल्या होत्या.
रत्नागिरी विभागातून १०२९ गाड्या मुंबईला रवाना झाल्या होत्या. यामध्ये २५० गाडयांचे ग्रुप बुकींग करून देण्यात आले होते. प्रवाशांच्या मागणीनुसार गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार २३० गाड्या गावातील मुंबईकरांसाठी सोडण्यात आल्या. एसटीच्या या उपक्रमामुळे मुंबईकरांची गैरसोय दूर झाली होती. चाकरमानी आणि एस.टी दोघांचाही यामध्ये फायदा झाल्याने गणपतीची कृपादृष्टी सर्वांवर असल्याचे स्पष्ट झाले.