यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था नवी दिल्लीच्या ५० व्या वार्षिक अधिवेशनात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे बोलत असताना, महाराष्ट्र देशात उच्च तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रामध्ये चांगले काम करत आहे, याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. तंत्रज्ञान हे फक्त माध्यम आहे. मात्र, आपल्याला विकास करताना राज्यातील सर्व क्षेत्रात समतोल विकास महत्वाचा आहे, असे मत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विज्ञान व उच्च तंत्रशिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सन २०२१ चा ज्येष्ठ जीवनगौरव पुरस्कार शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्काराबद्दल ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्हिडीओव्दारे आभार मानत मनोगत व्यक्त केले.
त्याचप्रमाणे, शैक्षणिक क्षेत्रातील उत्तम कामगिरीसाठी देशातील उत्कृष्ट कुलगरु तसेच इंजिनीयरींग महाविद्यालयांच्या प्राचार्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री म्हणाले, तंत्रशिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करणे, अत्यंत आनंददायी आहे. आज तंत्रज्ञानात कितीही प्रगती झाली तरी, आपल्याला निसर्गातून अनेक गोष्टी आत्मसात कराव्या लागतात.
आपल्याकडे तंत्रज्ञानातील अनेक विद्वान लोक आहेत त्यांचे मार्गदर्शन घेवून आपण आपल्या राज्याला नक्कीच प्रगतीकडे नेवूया. राज्याला नव्याने सुरु होणारे कला विद्यापीठ ही काळाची गरज आहे. आगामी काळातील कला विद्यापीठ राज्याच्या विकासात नक्कीच भर घालणारे आहे, असे मत मुख्यमंत्री यांनी व्यक्त केले.
कोल्हापुराकडे तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या आयएसटीईचे नेतृत्व आहे. ज्या भूमीत छत्रपती शाहू महाराजांनी समानते, सक्षमतेचा आणि शिक्षणाचा पाया रचला, त्या भूमीकडे हे नेतृत्व आहे, ही राज्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, या कार्यक्रमाच्या माध्यम्यातून अनेक तज्ज्ञ लोकांना भेटता आले हे मी भाग्य समजतो. अनेक नव्याने तंत्रशिक्षण क्षेत्रातील संस्था उभ्या राहिल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्रही उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रात अत्यंत महत्वपूर्ण पाऊले उचलत आहे.