मागील वर्षापासून अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना देश करत आहे. एकीकडे डिसेंबर महिन्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे तर दुसरीकडे हवामान खात्याने आता येणाऱ्या चक्रीवादळाचा धोक्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रामध्ये या काळात हिंवाळा ऋतू सुरु असतो, त्यातील अनेक भागांमध्ये सध्या पाऊस मोठ्या प्रमाणात पडत आहे. अशातच आता ‘जवाद’ चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हवामानातील बदलांमुळे राज्यातील अनेक भागांमध्ये दोन दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आंध्र आणि ओडिसाच्या समुद्र किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पुन्हा एकदा चक्रीवादळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ही स्थिती ३ डिसेंबरपर्यंत अजून ताकदवान होऊन त्याचे रुपांतर चक्रीवादळामध्ये होऊन ते उत्तर-पश्चिम दिशेला पुढे सरकणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबई, पुणे, कोकणात कालपासूनच पावसाची रिपरिप सुरु आहे. तसेच रात्रभरही अधिक प्रमाणात पाऊस कोसळत होता. याशिवाय ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगडमध्येही पावसानं हजेरी लावली आहे. आज मुंबईसाठी हवामान खात्यानं यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि मालदीव लक्ष्यदिपच्या परिसरात चक्रीवादळ तयार झाल्यामुळे पाऊस पडत आहे.
ऑक्टोबरमध्ये हिट आणि पावसाळा अनुभवल्यानंतर नोव्हेंबरमध्ये देखील पाऊस आल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठं नुकसान झालेल. मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून ३० नोव्हेंबर रोजी अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यानं पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
ऐन हिवाळ्यात राज्यातील अनेक भागात पावसानं हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसाचा ग्रामीण भागाला मोठा फटका बसलाय. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात शेती, फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सातारा शहर आणि महाबळेश्वरमध्येही अवकाळी पावसाची रिपरीप सुरु आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरीच्या पीकाला देखील धोका निर्माण झाला आहे. कोकणातील रत्नागिरीतल्या चिपळूण, गुहागर, खेड, दापोलीतही सरी बरसल्यामुळे नुकतच मोहोरलेले आंबा पीक संकटात सापडल आहे.

