लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वाना गरजेप्रमाणे स्मार्ट फोनचा वापर करता येणे गरजेचे आहे. कधी एखाद्या वेळला गरज भासली तर न डगमगता फोन लावता येणे आवश्यक आहे. सध्याच्या काळात लहान मुलांना सुद्धा मोबाईल मोठ्यांपेक्षा जास्त कळतो म्हणायला हरकत नाही. एकतर सध्या शाळा ऑनलाईन आणि मोबाईल कायम जवळ त्यामुळे त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.
स्मार्टफोन्सच्या अती प्रमाणातील वापरामुळे लहान मुलांच्या मेंदूवर आणि एकाग्रतेवर गंभीर परिणाम होत असल्याचं राष्ट्रीय बालहक्क आयोगाने केलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आल आहे. देशातील जवळपास २४ टक्के मुलं झोपण्यापूर्वी स्मार्टफोन्स वापरतात, वयानुसार हे प्रमाण वाढत जातं आणि याचा गंभीर परिणाम मुलांच्या आरोग्यावर होत असल्याचं आयोगाच्या अभ्यासात नोंदवण्यात आल आहे. लॉकडाऊनमध्ये लहान मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याचं तज्ज्ञ आधीच सांगत आहेत. मात्र आता या नव्या अभ्यासातून यावर शिक्कामोर्तब झालंय. देशातील ३८ टक्के मुलांमध्ये स्मार्ट फोन्सच्या अतीवापरानं एकाग्रता कमी झाल्याचं या अभ्यासातून समोर आलं आहे.
लॉकडाऊन त्यात सुरू झालेला ऑनलाइन शिक्षण व मुलांचा स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वाढता वापर यावर राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने अभ्यास केला आहे. या अभ्यासातून देशातील मुलं इंटरनेट आणि स्मार्टफोनचा वापर किती प्रमाणात करत आहेत? ती मोबाईलच्या आहारी किती गेली आहेत? यांच्या अतिवापरामुळे नेमके काय दुष्परिणाम होतात, हे या अहवालामध्ये मांडण्यात आले आहे. यामध्ये देशातील शहरी तसेच ग्रामीण भागातील देखील पाच हजार मुलांना या सर्व्हेमध्ये सहभागी करून यावर अभ्यास करण्यात आला आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला कि, त्याचे दुष्परिणामही सहन करण्याची तयारी ठेवणे गरजेचे असते.