भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी सत्ताधाऱ्यांवर आज आगपाखड केली आहे. रत्नागिरी तालुक्यातील अनेक विकासकामे राजकारण आणि लोकप्रतिनिधींच्या आडमुठेपणामुळे आणि अनेकदा मागणी करून सुद्धा दखल न घेतल्यामुळे रत्नागिरीमधील मागील ३ वर्षापासून खोदलेले एसटी बसस्थानकाचे काम अजून देखील पूर्णत्वास गेलेले नाही.
रत्नागिरीमध्ये नवीन अद्ययावत प्रशासकीय इमारत होणार असल्याची बातमी सर्वत्र व्हायरल होत आहे आणि रत्नागिरी साठी हि नक्क्कीच चांगली गोष्ट आहे. परंतु तीन वेळा भूमीपूजन केलेले असून सुद्धा तीन वर्षे रखडलेले एसटी बसस्थानकाचे काम कधी पूर्ण होणार?? रत्नागिरी नगरपरिषदेची नळपाणी योजना पाच वर्षापासून सुरू आहे, तीचे कामकाज कधी पूर्ण होणार असा सवाल सामान्य रत्नागिरीकरांच्या मनात उत्पन्न होत आहे.
जिल्हा परिषदेमधील वैद्यकीय रिक्त पदे याकडे गांभिर्याने न पाहता सरळ दुर्लक्ष केले जात आहे. पायाभूत सुविधांची उपलब्ध नाही आहेत. मंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये फक्त पोकळ घोषणा केल्या जातात आणि भूमीपूजने मोठ्या प्रमाणात होत आहेत, प्रत्यक्षात मात्र विकासकामे पूर्ण होत नाहीत, ही प्रत्येक रत्नागिरीकराची खंत आहे, असे म्हणत जहरी टीका त्यांनी केली.
प्रशासकीय इमारत बनविण्यासाठी त्वरित निधी दिला जातो. परंतु अद्याप रखडलेली कामे कधी आणि किती कालावधीमध्ये पूर्ण होणार आणि अनेक योजनांमध्ये असलेली निकृष्ट दर्जाची कामे इत्यादींची पोलखोल अनेकदा नागरिकांनीच केली आहे. तीन एक वर्षापूर्वी केलेल्या एसटी बसस्थानकाचे काम अद्याप अपूर्णच असून त्यासमोरील एसटी बसेसचा थांबा येथे अजून निवारा शेड बांधण्यात आलेली नाही. मंत्रीमहोदयांनी नगरसेवकांना याबाबत सूचना दिली होती. परंतु ती का पूर्ण झाली नाही, याचे उत्तर विचारण्यात आले का? असा थेट सवाल करण्यात आला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले कि, मंत्रीमहोदय वाशिष्टीला पाहिजे तेवढा निधी देणार आहेत. परंतु वाशिष्टीप्रमाणे रत्नागिरी मतदारसंघातही विकासकामे अपूर्ण आणि रखडलेली आहेत. आपण शासनाचे जबाबदार प्रतिनिधी आहात, त्यामुळे जनताभिमुख काम प्रथम होणे अपेक्षित आहे. अशी अपेक्षा अनिकेत पटवर्धन यांनी व्यक्त केली.