कोरोनाबाधितांची संख्या घटल्याने जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील बहुसंख्य शाळा कालपासून सुरू करण्यात आल्या आहेत. पटसंख्या अधिक असलेल्या शहरी भागातील शाळांमध्ये गर्दी टाळण्यासाठी एक दिवस मुले, एक दिवस मुली असे नियोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटचा प्रभाव मध्यंतरी वेगाने वाढत चालला असल्याने, २ वर्षानंतर सुरु करण्यात आलेल्या शाळा अचानक पुन्हा बंद कराव्या लागल्या होत्या.
त्यांनतर शासनाच्या निर्णयानुसार १ फेब्रुवारी २०२२ पासून पुन्हा शाळा सुरु करण्यास संमती देण्यात आली. सकाळ आणि दुपारच्या सत्रात शाळांमधील किलबिलाट सुरू झाला. ग्रामीण भागातील अनेक शाळांची पटसंख्या कमी असल्यामुळे अनेकांनी वर्ग चालूच ठेवले होते.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दोन हजार ५२२ जिल्हा परिषद आणि ४६५ माध्यमिक अशा तीन हजार १०२ शाळा आहेत. त्यापैकी दोन हजार ७७५ शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. संगमेश्वर तालुक्यातील दहा शाळा सुरू करण्यास तेथील शाळा व्यवस्थापन समितीने तूर्तास नकार दिला होता. त्यामुळे त्या शाळ बंदच आहेत. तर मंडणगड तालुक्यातील दोन आश्रमशाळा अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत. जिल्ह्यात सव्वादोन लाख विद्यार्थी असून त्यातील ८० टक्के विद्यार्थ्यांनी हजेरी लावली आहे.
मागील कोरोनाची २ वर्षे घरात बसून घालवल्यानंतर मुले सुद्धा शाळेत जाण्यासाठी उत्सुक आहेत. ऑनलाईन क्लासेसना बसून हि मुले टेक्नोसेव्ही झाली असली तरी, ऑनलाईन अभ्यासक्रमाला ती कंटाळली आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष वर्गात बसून शिक्षणाकडे त्यांचा कल दिसून येत आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या कालावाधीनंतर सुद्धा विद्यार्थी खूपच उत्साही दिसत आहेत.