रत्नागिरी नगर परिषद बॉडीचा कार्यकाल संपल्याने आता नगरपालिकेचा कारभार प्रशासकांच्या हाती गेल्यावर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सभापती केबिनला टाळे लावण्यात आले आहे. मागील सत्ताधार्यांची पाच वर्षे रत्नागिरी पालिका थेट निवडणूक लढून निवडून आलेल्या नगराध्यक्षांना कार्यकाल संपायच्या आधीच तीन महिने रजेवर पाठवणे, त्यानंतर अडीच वर्षांचा कालावधी वाटप, पाणी योजनेला आलेली स्थगिती, साठवण टाकीसाठी सव्वा कोटीची जमीन खरेदी इत्यादी अनेक विषयांवर गाजत होती.
रत्नागिरी तालुक्यासह चिपळूण, खेड नगर परिषदांतील नगर सेवकांची मुदत २७ डिसेंबर संपली. राजापूर नगर परिषदेची मुदत बुधवारी २९ रोजी पूर्ण होत असून दापोलीची मुदत २५ डिसेंबर रोजी संपुष्टात आली आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी नगराध्यक्षांचे अधिकार वापरण्यासाठी कोणीच नसल्याने त्याजागी प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रशासकांची नियुक्ती शासनाच्या नगर विकास मंत्रालयामार्फत करण्यात आली आहे. रत्नागिरी, चिपळूण न.प.साठी मुख्याधिकारी, राजापूर व खेड न.प.साठी उपविभागीय अधिकारी आणि दापोली नगर पंचायतीसाठी तहसीलदारांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली आहे.
नगराध्यक्षांकडे जे अधिकार असतात ते आता प्रशासकांकडे आले आहेत. त्यासाठी तालुक्यासाठी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ते जाणून घेऊया. रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर, चिपळूणचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांची त्याच नगर परिषदांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली आहे. राजापूर नगर परिषदेसाठी उपविभागीय अधिकारी वैशाली माने, खेड नगर परिषदेचे प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी राजश्री मोरे यांची प्रशासक म्हणून निवड करण्यात आली आहे. दापोली नगर पंचायतीच्या प्रशासक म्हणून तहसीलदार वैशाली पाटील यांची नियुक्ती झाली आहे.