विधानसभेत राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये घालण्यात आलेल्या गोंधळानंतर अध्यक्षांच्या दालनात गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपाच्या १२ आमदारांचे तत्काळ निलंबन केले होते. दरम्यान, आज सभागृहामध्ये आमदारांचे वर्तन तसेच सभागृहाचे पावित्र्य न राखता होणारी टिंगल टवाळी याबाबत अजित पवार यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली असून, असे वर्तन करणाऱ्या सदस्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे.
सभागृहात अनेक सदस्य नियमभंग करत असल्याचे दिसून आले आहे. सभागृहात अध्यक्षांकडे पाठ करून बसून, अनेकजण खुशाल गप्पा मारताना दिसतात. येताना अध्यक्षांना नमस्कार करावा, जाताना नमस्कार करून बाहेर जाणं नियमात आहे. मात्र अनेक आमदारांनी नमस्कार करणं सोडूनच दिलं आहे, कोणीही कुठेही येऊन बसतं. निदान मुख्यमंत्र्यांचे आसन तरी सोडा, असा टोला अजित पवार यांनी लगावला.
अशा प्रकारच्या गैरवर्तन करणाऱ्या सदस्यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी अजित पवार यांनी केली. मात्र कुणाचे बारा बारा महिन्यांसाठी निलंबन होऊ नये, अशी विनंती अध्यक्षांकडे करत अजित पवार यांनी एकप्रकारे १२ आमदारांच्या झालेल्या निलंबना विरोधात भाजपाचे अप्रत्यक्षरीत्या समर्थनच केल्याचे दिसून येते. अजित पवार पुढे म्हणाले की, सभागृहामध्ये काही अशा प्रकारच्या गैर घटना घडत असतात. दरम्यान, सभागृहात गैरवर्तन करणाऱ्या, सभागृहाच्या प्रथा-परंपरा न पाळणाऱ्या आमदारांनाही अजित पवार यांनी फैलावर घेतले आहे.
माझी विनंती आहे की, एखादा सदस्य चुकला तर त्याला चार तास बाहेर ठेवा, अगदी हे चार तास कमी वाटले तर, त्याचे दिवसभरासाठी निलंबन करा, म्हणजे त्याला त्याची चूक लक्षात येईल. पण कोणाला बारा महिन्यांसाठी बाहेर पाठवू नका.