२४ ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री ना. नारायणराव राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेमध्ये त्यांनी केलेल्या विधानाबद्द्ल आघाडी सरकारने राणेंना अटक केली. सदरची घटना हि खूपच निंदनीय असून, सरकारने सूड बुद्धीने केलेली ही कारवाई आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी ज्या प्रकारे कारवाईसाठी सरकारी अधिकाऱ्यांना आक्षेपार्ह दमदाटी करत अटक करण्याचे आदेश दिले, ती बाब पूर्णत: अयोग्य आहे. सोशल मिडीयावर या बाबतची व्हीडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
या संदर्भात भारतीय जनता युवा मोर्चा द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी रत्नागिरी शहर पोलिस निरीक्षक श्री. विनीत चौधरी यांच्याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री अनिल परब आणि सामना संपादक यांचेवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदन देऊन केली आहे. सोबत भाजयुमोचे माजी अध्यक्ष राजेश मयेकर हेदेखील उपस्थित होते.
त्यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे की, हे अटक प्रकरण मा.नारायणराव राणे यांच्या ज्या विधानावरून करण्यात आले, त्या प्रकारची किंबहुना त्याहीपेक्षा वाईट विधाने आमच्या नेत्यांच्या संदर्भात संबधित पक्षाच्या नेत्यांकडून या पूर्वी करण्यात आलेली आहेत. ना. नारायणराव राणे साहेबांवरील कारवाईचे आदेश देणाऱ्या मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री मा. ना. आदित्यनाथ योगी यांच्याविषयी जाहीर भाषणात काढलेले अनुद्गार सर्वश्रुत आहेत. त्या भाषणाची क्लिपसुद्धा समाजमाध्यमात प्रसारित झालेली आहे. त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करण्यात यावी. स्वतःसाठी वेगळा न्याय आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांसाठी वेगळा न्याय अशी भूमिका घेणाऱ्या या सरकारचा जाहीर निषेध भारतीय जनता युवा मोर्चा आणि भारतीय जनता पार्टी करत आहे.
त्याचप्रमाणे, या संदर्भात दैनिक सामनामध्ये ज्या पद्धतीने भडक आणि अपमानास्पद लिखाण प्रसिद्ध करण्यात आले आहे, ती बाबही निषेधार्थ आहे. त्यामुळे सदर दैनिकाच्या संपादक मंडळींवर कठोर कारवाई करण्यात यावी. संबंधितांवर त्वरित गुन्हे नोंद व्हावेत, अशी मागणी आपल्या माध्यमातून गृह विभाग आणि सरकारकडे करत आहोत.