शिवसेनेमध्ये फुट पडल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरेंची शिवसेना यामध्ये मोठ्या प्रमाणात वाद विवाद , आरोप प्रत्यारोप होऊन वादंग निर्माण झाले. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपचे सरकार स्थापन झाल्यावर, मविआच्या काही मंत्र्यांच्या सुरक्षा कमी करण्यात आल्या आहेत तर काहींच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे.
मागील आठवड्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव यांनी राज्याच्या गृहमंत्रालयाने आपली सुरक्षा काढून घेतल्याचा आरोप केला होता. ही सुरक्षा काढून घेतल्यानंतरच आपल्या पाग चिपळूण येथील घरावर हल्ला झाल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. ते जरी तेंव्हा घरी उपस्थित नव्हते तरी देखील, त्यांच्या घरातील सदस्यांना यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यानंतर भास्कर जाधव यांना आता मावळचे शिवभक्त बाबाराजे देशमुख यांचे सुरक्षाकवच मिळणार आहे. याबाबत स्वतः भास्कर जाधव यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून माहिती दिली.
त्यावेळी बोलताना जाधव म्हणाले कि, मावळ येथील कट्टर शिवभक्त बाबाराजे देशमुख आज मला भेटायला आले होते. एकीकडे शासनाने माझे संरक्षण काढून घेतले आणि दुसरीकडे राज्यात ठिकठिकाणी माझ्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भेटायला आलेल्या बाबाराजे यांनी मला सांगितलं, “तुम्ही बिनधास्तपणे महाराष्ट्रात फिरा आणि राज्यभर तुमच्या भाषणांचा सुरू असलेला धडाका असाच चालू राहू द्या, संरक्षणाची चिंता करू नका. जिथे जाल तिथे तुमच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही घेऊ..!!” बाबाराजे, आपण अत्यंत आपुलकीच्या नात्याने भेटून मला पाठिंबा दिलात, त्याबद्दल आपले व आपल्या सर्व सहकाऱ्यांचे आभार !!