देशभरात बिल्किस बानोच्या सामुहिक बलात्कार प्रकरणी जन्मठेप झालेल्या दोषींच्या सुटकेवरुन निदर्शने होत आहेत. देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य महोत्सवी वर्षाबाबत काही आरोपींना मुक्त करण्यात आले होते. त्यामध्ये या दोषींना देखील मुक्त करण्यात आल्याने, सर्वत्र तीव्र प्रतिसाद उमटलेले दिसत आहेत.
बिल्किस बानोला न्याय मिळावा यासाठी अनेक समाजिक संघटना रस्त्यावर उतरल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही देखील बिल्किस बानोला न्याय मिळावा म्हणून राज्यभर मूकनिदर्शने केली. आज शरद पवार यांनी ठाणे शहरात पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. बिल्किस बानो प्रकरणात गुजरात सरकारने घेतलेल्या भूमिकेवर शरद पवार यांनी जोरदार टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात स्त्री वर्गाचा सन्मान करण्याची भूमिका मांडली होती. मात्र, त्यानंतर गुजरातमध्ये मोदींच्याच विचाराच्या सरकारने लाजीरवाणे आणि घृणास्पद कृत्य करणाऱ्यांना आरोपींना तुरुंगातून सोडण्याचा निर्णय घेतला. हे अत्यंत चिंताजनक चित्र आहे, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गुजरातमधील सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला तर फक्त बोलणं महत्त्वाचं नसून कृती महत्त्वाची असते, अशा शब्दात पंतप्रधान मोदींना टोला लगावला.
२००२ सालामध्ये गोध्रा येथे रेल्वे जाळल्यानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या हिंसाचारात बिल्किस बानोवर सामूहिक बलात्कार झाला होता. त्यावेळी ती २१ वर्षांची होती आणि ती पाच महिन्यांची गर्भवतीही होती. तिच्या तीन वर्षांच्या मुलीसह तिच्या कुटुंबातील सात जणांना तेव्हा ठार करण्यात आले होते. बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींना तुरुंगातून सोडण्यात आले. जन्मठेप ही आजन्म असते. केंद्रातील भाजप सरकारने याआधी देशवासियांना दिलेली अनेक आश्वासने पूर्ण केली नसल्याचं सांगत आपण लवकरच राज्यातील काही जिल्ह्यांचा दौरा करून आढाव घेणार आहोत, अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे.
बिल्किस बानो सामूहिक बलात्कार आणि तिच्या कुटुंबीयांच्या हत्ये प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या ११ दोषींच्या सुटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि गुजरात सरकारला देखील नोटीस बजावली आहे. दोषींना सूट देताना विवेकाचा वापर करण्यात आला होता का, असा प्रश्न न्यायालयाने विचारला आहे.