रत्नागिरी आत्ता तिसऱ्या टप्प्यात उघडण्यात आली असून, सध्या सर्व दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ४ या वेळेत उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी होत असल्याने व्यापारी अस्थापना, व्यवसाय यांना सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० पर्यंत व्यवहारांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र अद्यापही या ठराविक वेळेमध्ये व्यापार उद्योगाला मनाजोगी चालना मिळताना दिसत नाही.
ग्राहकांनाही सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० ह्या वेळेमध्ये खरेदीला जाताना, कार्यालयाच्या कामकाजाच्या वेळा सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कार्यालयीन काम आणि दुकानाची मर्यादा हि एकच वेळ असल्याने खरेदी करतांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. त्यामुळे सायंकाळी ४.०० वाजता बंद होणारा व्यापार कार्यालयीन कामकाजाच्या वेळेनंतर किमान ३ तास सुरू ठेवल्यास ग्राहकांना तसेच व्यापाऱ्यांनाही सोयीचे ठरेल. ३ तासाची मर्यादा वाढवून ग्राहकांची सोय व्हावी. तसेच व्यापारातील गिऱ्हाईकांची उलाढाल वाढण्यास मदत होईल.
शहरी भागात असून सुद्धा नागरिकांची मोठ्या प्रमाणात अडचण होत आहे. तसेच व्यापारी वर्गावरही या वेळेच्या मर्यादेचा अनिष्ठ परिणाम जाणवू लागला आहे. येणाऱ्या गणेशोत्सवासाठी सुद्धा बाजारपेठ जास्त वेळ उघडी राहिली तर ग्राहक आणि विक्रेत्यांना सुद्धा सोयीचे आणि फायद्याचे ठरणार आहे, यासाठी स्थानिक प्रशासनाने सारासार विचार करून ३ तासांची वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी आज भा.ज.पा.च्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली. व्यवसायिकांना त्यांच्या अस्थापना सायंकाळी ४.०० वाजता बंद न करता सायंकाळी ७.०० पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी अशी विशेष मागणी भाजपा रत्नागिरीमधून जोर धरत आहे.