मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील सर्व दुकाने आणि आस्थापनांना मराठी अक्षरात लिहिण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यांची मुदत ३१ मे रोजी संपली आहे. आता मराठी भाषेतील फलक नसलेल्या दुकानांवर महानगरपालिका १० जूननंतर कारवाई करणार आहे. सद्यस्थितीत १ जूनपासून कारवाई न करता महानगरपालिकेने दुकानदारांना मराठीत फलक बदलण्यासाठी आणखी काही दहा दिवसांचा कालावधी दिला आहे.
महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दुकानदारांना ही अखेरची संधी देण्यात आली आहे. यानंतर महानगरपालिका कठोर कारवाई करेल. सुरुवातीला महानगरपालिकेचे मुंबईत ४.५ लाख दुकानांचे लक्ष्य असेल, ज्यामध्ये शोरूम, स्टोअर्स आणि मोठी दुकाने यांचाही समावेश असेल.
मुंबईतील दारूच्या दुकानांच्या फलकावर महापुरुषांची किंवा किल्ल्यांची नावे लिहिण्यास पालिकेने बंदी घातली आहे. या दुकानांमधून महापुरुष आणि किल्ल्यांची नावे १० जूनपर्यंत हटवावी लागणार आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर न्यायालयीन कारवाई करण्यात येणार आहे, असा सज्जड इशाराच महानगरपालिकेने दिला आहे.
महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबईतील ज्या दारूच्या दुकानावर महापुरुष किंवा किल्ल्यांची नावे आहेत, त्यांना नाव बदलावे लागेल. नावे बदलण्यासोबतच महापुरुषांच्या नावावर आता नवीन नाव ठेवण्यासही महानगरपालिकेने बंदी घातली आहे.
दुकाने आणि आस्थापने मराठीत फलक लावत आहेत की नाही, याची प्रत्येक प्रभागात तपासणी केली जाईल, असे पालिकेचे उपायुक्त संजोग काबरे यांनी सांगितले. यासाठी ७५ निरीक्षक नेमले आहेत. याशिवाय त्यांच्यासोबत आणखी एक अधिकारी उपस्थित राहणार आहे.
तपासणी दरम्यान दुकानदाराने मराठी फलक लावण्यास नकार दिल्यास त्याच्यावर न्यायालयीन कारवाई करण्यात येईल. दुकानदाराला न्यायालयीन कारवाई टाळायची असेल तर त्याला दंड भरावा लागेल. याअंतर्गत दुकानात काम करणाऱ्या प्रति व्यक्ती २,००० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.