जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यामध्ये जलशक्ती अभियान २०२२ कार्यक्रमातंर्गत कॅच दी रेन अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी बैठक झाली. यंदा फेब्रुवारीपासूनच पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने उपलब्ध जलसाठ्यांचे आणि स्त्रोतांचे जतन करणे आवश्यक आहे. जलस्त्रोतांचे संरक्षण व नूतनीकरण, पावसाच्या पाण्याचे संवर्धन, सांडपाणी व्यवस्थापन, वृक्षलागवड, भूजल साठ्यामध्ये वाढ करणे आदी कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता मिशन कक्षामार्फत पाणी गुणवत्ता सर्वेक्षण व सनियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये १ ते ३० एप्रिल आणि २ ते ३० ऑक्टोबर २०२२ या कालावधीत जिल्ह्यातील ७ हजार ७९० सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकार्यांवर या सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे.
बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, उपजिल्हाधिकारी रोहयो अमिता तळेकर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, जिल्हा जलसंधारण अधिकारी द. यो. दामा, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे, जि. प. ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता दयानंद परवडी आदी उपस्थित होते. या अभियानातंर्गत जलस्त्रोतांचे संरक्षण व नूतनीकरण, सांडपाणी व्यवस्थापन, पावसाच्या पाण्याचे संवर्धन, वृक्षलागवड, भूजलसाठ्यामध्ये वाढ करणे इत्यादी कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत.
याबाबतची माहिती जलशक्ती अभियानाच्या पोर्टलवर संबंधित विभागांनी वेळोवळी अद्ययावत करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी पाटील यांनी बैठकीमध्ये दिल्या. तसेच नेहरु युवाकेंद्र, एनएसएस, शाळा व महाविद्यालये, अंगणवाड्या, ग्रामसभा, विविध सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून या अभियानाची जनजागृती करण्यात यावी, असे जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी सांगितले. जिल्हा जलसंधारण अधिकारी द. यो. दामा यांनी संबंधित पोर्टल बाबतची माहिती सर्वाना दिली.