रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. त्यामुळे अनेकांच्या नौका मासेमारीसाठी खोल समुद्रात जातात. मत्स्यव्यवसायिकांसाठीचा नवीन कायदा निर्माण झाला आहे आणि विशेष म्हणजे तो व्यवसायिकांच्या हिताचा असल्याची प्रतिक्रिया अनेक मत्स्य व्यवसायिकांकडून आली आहे.
जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी जिल्ह्यातील व्यावसायिकांना आवाहन केले आहे कि, अनेक वेळा नौका समुद्रात दूर गेल्यावर काही दुर्घटना घडली तर ती कळेपर्यंत आणि त्यांच्या पर्यंत मदत पोहोचेपर्यंत उशीर होतो. त्यामुळे मत्स्यव्यवसाय विभागामार्फत व सागरी सुरक्षा यंत्रणेमार्फत मासेमारी नौकांची तपासणी वेळोवेळी करण्यात यावी. मासेमारी नौकांवर कार्यरत असलेले नौका मालक, तांडेल व खलाशी यांचे मूळ मासेमारी परवाना, ओळखपत्र, नौकेची नोंदणी प्रमाणपत्र, सर्वांच्या विमा प्रती तसेच नौकेवरील तांडेल व खलाशी यांची जीवन रक्षक साधने, अग्निशामन साधनांची उपलब्धता असणे बंधनकारक आहे. परंतु सद्य स्थितीला हि उपलब्धता दिसून येत नाही आहे.
ही गोष्ट सागरी सुरक्षेच्या दृष्टीने व मच्छिमारांच्या जिवीतहानी टाळण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. मच्छिमारांनी नौकेवर जीवरक्षक साधनांसमवेत यांत्रिक नौकांवर VTS, AIS,DAT इत्यादी यंत्रप्रणाली बसविणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या होत असलेल्या मासेमारीला आळा बसण्यासाठी तसेच शाश्वत पारंपारिक मासेमारी टिकून राहण्यासाठी आणि सागरी सुरक्षेच्या हेतूने प्रत्येक मासेमारी नौकेवर सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात यावा. त्याचप्रमाणे नोंदणी प्रमाणपत्रानुसार नौकेवर जास्त तांडेल व खलाशी पाठवले जाणार नाहीत याची दक्षता मालकांनी घेणे गरजेचे आहे. अतिरिक्त तांडेल किंवा खलाशी आढळल्यास सागरी सुरक्षेयंत्रणेमार्फत अतिरिक्त तांडेल/खलाशांवर कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे.
मासेमारी बंदी कालावधीमध्ये कोणतीही यांत्रिकी नौका मासेमारीस जाणार नाही याबाबत देखील सर्व मच्छिमारांनी दक्षता घ्यावी व सुरक्षा रक्षकांनी सदर नौका बंदी कालावधीत मासेमारीस जाण्यास प्रतिबंध करतील. सागरी सुरक्षेच्या दृष्टीने व जिवीतहानी टाळण्याकरीता सर्व मच्छिमारांनी वरील सर्व बाबींची पूर्तता करुनच मासेमारीस जावे. अन्यथा होणार्या दुर्घटनेला सर्वस्वी नौका मालक जबाबदार राहतील असे जिल्हाधिकार्यांनी सांगितले आहे.