राज्यातील कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वेगाने वाढत चालली होती. त्यामुळे पुन्हा एकदा कडक निर्बंध करण्याची वेळ आली. मात्र कडक निर्बंध लावल्यानंतर कोरोना प्रभावित रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसून आली आहे.
सध्या कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असल्यामुळे परीस्थिती काही अंशी दिलासाजनक आहे. कोरोना रुग्णांची संख्या घटत चालल्यामुळे, राज्य सरकारने दोन आठवड्यापूर्वी बंद असलेली शाळा- महाविद्यालये पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवारपासून शाळा, महाविद्यालये सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शाळा सुरु करण्याच्या या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील अनुकूल असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा संसर्ग आणि राज्यातील परिस्थिती पाहून बालवाडी ते महाविद्यालय असे संपूर्ण शिक्षण सुरू होणार असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे.
त्यावर प्रतिक्रिया देताना नाम. उदय सामंत यांनी सांगितले आहे कि, शाळांबरोबर महाविद्यालये सुरू करण्यासाठी कॅबिनेटमध्ये आज निर्णय घेण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवरील कोरोनाची परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्र्यांकडे तसा प्रस्ताव देखील आम्ही पाठवणार आहोत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरच पुढील कॉलेज सुरु कधी करायचे त्याबाबतचा निर्णय होईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे महाविद्यालये कधी सुरू होणार याबाबत विद्यार्थी संभ्रमात होते. यावर बोलताना उदय सामंत म्हणाले, “कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे निर्बंध लादूनच कॉलेज सुरू केली जातील. १५ फेब्रूवारीपर्यंत होणाऱ्या सर्व परीक्षा सद्य स्थितीला तरी ऑनलाईनच होतील” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.