राजापुरात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाबाबत अजून कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. आपण संबंधित कंपनीसोबत चर्चा करणार आहोत. जर कंपनी तयार असेल तर कितीही विरोध असू द्या, सर्व विरोध झुगारून १००% रिफायनरी उभी करू, अशी स्पष्ट भूमिका रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खा. नारायण राणे यांनी मांडली आहे. ते रत्नागिरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. खा. नारायण राणे यांनी सोमवारी रत्नागिरीत आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात ही आढावा बैठक पार पडली. या बैठकीला आ. किरण सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्यासह विविध खात्यांचे खातेप्रमुख उपस्थित होते.
महामार्गाबाबत ताकीद – या आढावा बैठकीत मुंबई-गोवा महामार्ग, जयगडमधील वायुगळती आणि रत्नागिरीच्या विमानतळासह अर्जुना व वाशिष्ठी नदीतील गाळाचा विषय प्रामुख्याने चर्चेला आला. मुंबई- गोवा महामार्गाबाबत अधिकाऱ्यांना सक्त ताकीद देत एप्रिलअखेरीस मुंबई- गोवा महामार्ग पूर्ण झालाच पाहिजे, असा इशारा देऊन जे अधिकारी या कामाबाबत कुचराई करतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले.
निवळी उड्डाणपूल – तसेच निवळी येथील उड्डाणपूलाबाबत बोलताना खा. नारायण राणे यांनी सांगितले की, ग्रामस्थांनी मागणी केली की लोकप्रतिनिधी पत्र देतात, मीही पत्र दिलं, मात्र संबंधित खात्याचे व टेक्निकल विभागाचे या फ्लायओव्हरबाबत म्हणणे काय आहे? हे लेखी स्वरुपात येऊ द्या, जर फ्लायओव्हर हवा असेल तर मात्र त्याला विरोध होणार नाही, असे सांगून त्यांनी फ्लायओव्हरबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
विमानतळ लवकरच सुरू – रत्नागिरी विमानतळाबाबत आढावा घेताना त्यांनी प्रशासनाला सक्त सूचना केल्या आहेत. हे विम निंतळ लवकर सुरू व्हायला हवे. ज्या काही परवानग्या अडल्या आहेत त्या मी लवकरच मिळवून देतो, असे सांगून रत्नागिरी विमानतळावरील विमानसेवा लवकर सुरू व्हावी यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे खा. नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कोणाला आनंद होणार नाही? – एक मुलगा आमदार, एक मंत्री आणि बाप खासदार मग कोणाला आनंद होणार नाही? आज मी खूप आनंदी आहे. लवकरच निलेश राणे हे देखील मंत्री होतील. माझी दोन्ही मुले उच्चशिक्षित आहेत. मेरिटमध्ये निलेश राणे यांनादेखील मंत्रीपद मिळेल, असेदेखील बोलता बोलता ते म्हणाले.