शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली असून, आतापर्यंत ६५हून अधिक गुरे पकडण्यात आली आहेत. चंपक मैदानातील निवाराशेडमध्ये ही गुरे ठेवण्यात आली आहेत. या गुरांच्या देखभालीसाठी २४ तास पालिकेचे ४ कर्मचारी साफसफाई, चारा, पाण्यासाठी राबत आहेत. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांची तपासणी केली जाते. एका गुराला दिवसाला पेंढ्यांचा १५० रुपये खर्च येतो. अशा ६५ गुरांचे दिवसाला सुमारे पावणेदहा हजार पालिकेला खर्च करावे लागत आहेत. त्यात गुरांची संख्या वाढल्याने आता निवाराशेडदेखील कमी पडत आहे. या गुरांचे पुढे काय, हा प्रश्न अनुत्तरित असल्याने मोकाट गुरे सांभाळणे म्हणजे नाकापेक्षा मोती जड, अशी अवस्था पालिकेची झाली आहे.
रत्नागिरी शहरातील मोकाट गुरांच्या प्रश्नाकडे पालिकेने दुर्लक्ष केले होते. पालिकेकडे कोंडवाडा नाही आणि जास्तीतजास्त तीन दिवस या मोकाट गुरांना ठेवता येत होते; परंतु आता पकडण्यात आलेल्या गुरांना मालकच नसल्याने त्यांचा सर्व भार पालिकेवर पडत, आहे. शहरात सर्वत्र मोकाट गुरांचा मुक्त संचार सुरू आहे. कळपाने ही गुरे कुठेही फिरत आहेत. ठाण मांडून बसत आहेत. अचानक रस्त्यात आडवी येत असल्याने अपघात झाले आहेत, अशा अनेक समस्या आहेत.
पालिका कर्मचारी मेटाकुटीला – याबाबत माध्यम आणि राजकीय पक्षांनी उठाव केल्यामुळे मोकाट गुरांना पकडण्यास पालिकेने सुरुवात केली. गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये ६५ मोकाट गुरे पकडून ती चंपक मैदान येथील निवाराशेडमध्ये ठेवण्यात आली आहेत. कर्मचारी राबता, पैशाचा खर्च त्यामुळे पालिका कर्मचारी मेटाकुटीला आले आहेत.