रत्नागिरी जिल्हाधिकार्यांनी संगमेश्वर तालुक्यातील पाच गावे कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्याने संगमेश्वर बाजारपेठेतील व्यापारी संतप्त झाले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्या नंतर सुद्धा बाजारपेठ सुरु करण्यास परवानगी मंजूर झालेली नाही. उलट संगमेश्वरमधील नागरिकांवर कोरोना बाधित क्षेत्र लागू करून अजून कडक प्रतिबंध लादण्यात आले आहेत. रुग्ण संख्या जास्त नसताना हे प्रतिबंध कशासाठी? डेल्टा प्लस हा नवीन स्ट्रेन इथे सापडला आहे का ? यांसारखे अनेक प्रश्न या नागरिकांच्या मनात आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंगळवारी सकाळी संगमेश्वर बुरंबी येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तहसीलदार कोविड विलगीकरण कक्षाच्या उद्घाटनासाठी येणार असल्याचे वृत्त समजल्यावर तेथील व्यापाऱ्यांनी जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड आणि तहसीलदार सुहास थोरात यांना घेराव घालत त्यांच्या मनात असलेल्या सर्व प्रश्नांचा मारा केला. त्याचप्रमाणे कोणत्याही गोष्टीमध्ये कायम व्यापारीच भरडला जातो आणि त्याच्यावर गुन्हे दाखल केले जातात असे सांगितले गेले. व्यापारीवर्ग खूपच संतप्त झाला होता.
व्यापारी कोळवणकर यांनी सर्व व्यापाऱ्यांच्यावतीने व्यापार्यांना सामोरे जावे लागणाऱ्या समस्या आणि जिल्हा प्रशासनाकडून मिळणारी वागणूक याची सर्व माहिती कथन केली. त्याच प्रमाणे इतर व्यापारी पठाण यांनीही सांगितले कि, संगमेश्वर मधील व्यापारी संयमी आहेत, परंतु त्यांच्या संयमाचा अंत पाहू नका. बुधवार पर्यंत योग्य तो निर्णय द्या नाहीतर, दुकाने उघडायला परवानगी न दिल्यास गुरुवारपासून व्यापारी स्वतः दुकाने उघडतील असा सरळ इशारा येथील संगमेश्वर मधील व्यापाऱ्यांनी दिला आहे. प्रशासनाने कारवाई केल्यास त्याला देखील एकजुटीने सामोरे जाण्यासाठी सर्व व्यापारी तयार असल्याचे निवेदन सर्व व्यापार्यांनी प्रशासनाला दिले आहे.