पालघर जिल्ह्यात सातपाटी, डहाणू, अर्नाळा, नायगाव, पाचूबंदर यासह विविध भागांतील समुद्र किनाऱ्यांवर सुक्या मासळीचा मोठा व्यापार चालतो. हे सुकवलेले मासे चार ते पाच महिने टिकतात. हे मासे व्यवस्थितरित्या सुकवल्यानंतर बाजारात विक्रीसाठी आणले जातात. जिवंत मासळीची किंमत देखील मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक जण या हंगामात सुक्या मच्छीला पसंती देत आहेत.
पण सध्या मासेमारी व्यवसायच धोक्यात आल्याने पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनारी राहणाऱ्या मच्छीमार बांधवांवर आर्थिक संकट ओढवले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे मासेमारी करणे आणि मोठय प्रमाणात मासळी मिळणे देखील कठीण बनले आहे. अशातच चविष्ट मासे समुद्रात दुर्मिळ झाले आहे; तर सुकी मासळी बाजारात दाखल झाली आहे, पण महागाईमुळे त्याचे दर देखील वाढले आहेत.
आदिवासी क्षेत्रात सुक्या मासळीला अधिक मागणी असते. चवीला उत्तम असलेली सुकी मासळी साठवणूक करून ठेवली जाते. हिवाळ्यात सुकवून ठेवलेल्या मच्छीचा दर्जा उत्तम असतो. त्यामुळे आठवडा बाजार, शहरात भरणारे बाजार आदी ठिकाणी मांदेली, करंदी, बोंबील, वाकटी, खारा बांगडा, दाडा, जवळा, सुकट आदी प्रकारची सुकी मासळी दिसून येते, पण लांबलेल्या पावसामुळे काही ठिकाणी सुकवत ठेवलेल्या मासळीचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे ही मासळीदेखील कमी प्रमाणात बाजारात उपलब्ध आहे. त्यामुळे बाजारभाव मात्र चढ आहे.
पालघर जिल्ह्यात सुकी मासळी घेण्यासाठी इतर राज्यांतूनही व्यापारी येतात. एका गोणीत ४० किलो; तर एका ट्रकमध्ये सहा टन मासळी नेली जाते. यामुळे मच्छीमार बांधवांना फायदा होतो, परंतु यंदा मासळीचे उत्पन्नच कमी मिळाल्याने यंदा उत्पन्नात देखील मोठी घट होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.