प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी आमदार बच्च कडू यांनी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आश्वासनाचा केलेला विसर, तसेच अवकाळी पाऊस आणि शेतमालाच्या नुकसानीकडे होत असलेले गंभीर दुर्लक्ष याविरोधात मोठे पाऊल उचलले आहे. विस्मरणात गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी त्यांनी नागपूर येथील विधानसभेला घेराव घालण्याचा निर्धार केला असून, या भव्य आंदोलनाची सुरुवात दिनांक १३ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी शहरात आयोजित शेतकरी मेळाव्याने होणार आहे. या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठीं प्रहार जनशक्ती पक्षाच्या ठाणे जिल्हाप्रमुख काजल नाईक यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेतली. काजल नाईक यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, ‘आता आपली लढाई आपणच लढायची आहे,’ या भूमिकेतून बच्च कडू यांनी नुकताच राज्यातील ३६ जिल्ह्यांचा झंझावाती दौरा पूर्ण केला असून, या दौऱ्याचा समारोप रत्नागिरीत होणार आहे. त्यांनी सरकारच्या प्राथमिकतांवर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांच्या बेडसाठी २१ लाख रुपये खर्च केले जातात, पण लाखो शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेले कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी सरकारकडे वेळ नाही.
तसेच, अवकाळी पावसामुळे बागायतदारांचे झालेले प्रचंड नुकसान आणि त्यामुळे कोसळणारे कर्जाचे डोंगर याकडे सरकार गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठीच कडू यांचा १३ ऑक्टोबरचा रत्नागिरी दौरा निश्चित झाला आहे. त्यांच्या रत्नागिरी दौऱ्याची सुरुवात पहाटे गणपतीपुळे येथे आगमन आणि त्यानंतर नांदिवडे येथे सत्कार सोहळ्याने होणार असून, ते जिंदाल कंपनीने उभारलेल्या टर्मिनलची पाहणी देखील करणार आहेत. दि. १३ ऑक्टोबर रोजी दुपारी १.३० वाजता होणाऱ्या या मेळाव्यात बच्चू कडू केवळ कर्जमाफी किंवा नैसर्गिक नुकसानीवरच नव्हे, तर आंबा, मच्छीमार, पर्यटन आणि दिव्यांग यांच्या स्थानिक प्रश्नांवर उपस्थितांना मार्गदर्शन करतील. विशेषतः जयगड जिंदाल प्रकल्पाचा प्रश्न आणि बोगस एनओसी वापरून उभारलेल्या एनर्जी प्लाटमुळे गावकऱ्यांना होणारा त्रास, याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष सत्ताधाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे होत असल्याचा गंभीर आरोपही नाईक यांनी केला.