जयगड येथील जेएसडब्ल्यू एनर्जीचा दुष्परिणाम दिसू लागल्याचा आरोप नांदिवडे ग्रामस्थांनी केला आहे. तालुक्यातील नांदिवडे समुद्रकिनारी गोचरा, तावीज, पालू, शितकं, बटिया असे मासे सांडपाण्यामुळे मरून किनारी लागले होते. याचीच पुनरावृत्ती काल पुन्हा नांदिवडे समुद्रकिनारी झाल्याचे उघड झाले आहे. येथील जागरूक मच्छीमार ज्येष्ठ शिवसैनिक जयवंत गजानन आढाव, संतोष सीताराम हळदणकर, देवीदास श्रीरंग हळदणकर यांनी ही बाब जेएसडब्ल्यू एनजींचे जनसंपर्क अधिकारी नरेश विलणकर यांना कळविली. विलणकर यांनी नांदिवडे समुद्रकिनाऱ्याला भेट दिली व मृत्यू पावलेल्या मत्स्यसंपदेची पाहणी केली. १० ते १५ किलो वजनाचे मोठमोठे मासे यामध्ये गोबरे तसेच तावीज, पालु, शितकं असे मासे होते. जिंदलच्या औष्णिक ऊजकिंद्रातून अध्येमध्ये विषारी पाणी नांदिवडेच्या भरसमुद्रात सोडले जाते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे या बाबतीत अजिबात लक्ष नाही.
असा आरोप करत याबद्दल स्थानिक मच्छीमारांमध्ये तीव्र संताप आहे, असे सांगत जयवंत गजानन आढाव व सहकारी मच्छीमारांनी या विरोधात जनआंदोलन उभे करण्याचे सूतोवाच केले. जेएसडब्ल्यू एनर्जी कंपनी अशा पद्धतीने स्थानिक मच्छीमारांच्या भविष्याच्या उपजीविकेवर घाला घालत असल्याचा आरोप करत त्याबद्दल शासनाकडून योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे, असे सर्व स्थानिक मच्छीमारांचे जनतेचे मत आहे. याबद्दल लवकरच शासनदरबारी आवाज उठवण्यात येणार आहे, तत्काळ उपाययोजना न केल्यास मोठे आंदोलन उभारले जाईल, असे स्थानिक मच्छीमारांनी सांगितले.