प्राथमिक शिक्षकांना अशैक्षणिक कामांतून, विशेषतः बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) कामातून मुक्त करावे, अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे, अशी मागणी करणारे निवेदन मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षकसंघाने आज जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांना निवेदनाद्वारे केली. शिक्षकांच्या संघटनेने निवेदनात म्हटले आहे. यावेळी संघाचे राज्य कार्याध्यक्ष संतोष कदम, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अजय गराटे, सत्यजित पाटील, दिलीप तारवे, संतोष रावणंग, मनेश शिंदे, अशोक सुर्वे, रवींद्र कुळये, राजेश सोहनी, मंगेश मोरे, नानासाहेब गोरड, मनोजकुमार खानविलकर, नीलेश देवकर, सतीश मुणगेकर, महेंद्र रेडेकर उपस्थित होते.
संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शालेय शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी २२ फेब्रुवारी २००५ शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना दिलेल्या आदेशाचा संदर्भ दिला आहे. या आदेशानुसार, प्राथमिक शिक्षकांची अशैक्षणिक कामांसाठी नियुक्ती करू नये, असे स्पष्टपणे नमूद केले आहे. शिक्षणहक्क कायद्यांतर्गत प्राथमिक वर्गांसाठी विद्यार्थी-शिक्षक प्रमाणानुसार ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे प्रमाण निश्चित केले आहे. शिक्षणहक्क कायद्यानुसार, प्राथमिक वर्गांतील शिक्षकांना किमान २०० दिवस आणि उच्च प्राथमिक वर्गांतील शिक्षकांना किमान २२० दिवस अध्यापन करणे बंधनकारक आहे. हे अध्यापन वेळेत पूर्ण झाल्यास गुणवत्तेचे शिक्षण मिळू शकेल, असे संघटनेचे म्हणणे आहे.
२३ प्रकारांची अशैक्षणिक कामे – सध्या प्राथमिक शिक्षकांना मतदान नोंदणी, मतदार यादी दुरुस्ती, जनगणना, निवडणूक कामे, बालकांची शालेय नोंदणी, शिक्षण क्रीडा स्पर्धा यांसह एकूण २३ प्रकारांची अशैक्षणिक कामे करावी लागतात. या कामांमुळे शिक्षकांचा अध्यापनाचा वेळ मोठ्या प्रमाणावर वाया जातो आणि त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होतो. या सर्व बाबी लक्षात घेता, प्राथमिक शिक्षकांना अशैक्षणिक कामातून वगळण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.