सध्या दिवाळीची सुट्टी लागून आल्याने व कोरोनानंतर एक वर्षानंतर गणपतीपुळे रत्नागिरी येथील स्वयंभू श्रींच्या दर्शनासाठी मंदीर उघडले असल्याने मुंबई, पूणे, नाशिक याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील भक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसुन येत आहे. येथील व्यवसायिकांच्या मते साधारण भाऊबीजे नंतर पर्यटकांची गर्दी जास्त प्रमाणात होत असते, माञ काल शुक्रवार पासून लागून सुट्ट्या आल्याने, मोठ्या प्रमाणात गणपतीपुळे तीर्थक्षेञात गर्दी झाली.
बाहेरून आलेल्या पर्यटकांना समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने आणि एकीकडे समुद्रस्नान करण्याचा मोह देखील पर्यटकाना आवरता येत नसल्याने, पर्यटक मोठ्या पाण्यात जाण्याचे धाडस करताना दिसतात. त्यामुळे येथे असणाऱ्या ग्रामपंचायत जिवरक्षक तसेच मंदिर प्रशासनाचे सुरक्षा रक्षक व येथील पोलिस यंञणा यांच्यावर ताण येताना दिसत आहे. गेले दोन दिवस येथील ग्रामपंचायतीचे जिवरक्षक शिताफीने आपले कर्तव्य बजावत असताना दिसत होते.
पाण्याचा अंदाज न आल्याने रत्नागिरीतील प्रसिध्द पर्यटनस्थळ गणपतीपुळे मध्ये पर्यटकांचा बुडून मृत्यू होण्याचे प्रकार घडलेले कानावर येतात. हे लक्षात घेऊन किनार्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी भरती-ओहोटीच्या वेळा दर्शवणारे फलक लावण्यात आले असून, दिवसभर स्पीकरवरुन सुचना देण्यास सुद्धा सुरुवात करण्यात आली आहे. तसेच जीवरक्षक, सागरी रक्षकांद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. दिवाळीच्या सुट्टीत मोठ्याप्रमाणात पर्यटक दाखल होणार आहेत. गणपतीपुळेतील एमटीडीसीची निवास स्थानांसह हॉटेलमध्ये पुढील आठवडाभर पर्यंत पर्यटकांची बुकिंग दिसून येत आहे. या कालावधीत गणपतीपुळे किनारी पर्यटकांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे.
हॉटेल आणि लॉज व्यावसायिकांचा बिझनेस अजुनही पाहीजे तसा सुरु झाला नाही आहे. येणारे भक्त, पर्यटक हे एक दिवसाची ट्रिप काढताना दिसत आहेत. त्यामुळे अजूनही येथील बऱ्याचशा रूम्स अजूनही रिकामे असल्याचे सांगण्यात येत आहे.