कोकण विभागावर मागील दीड ते दोन वर्षापासून अनेक नैसर्गिक आपत्त्ती कोसळत आहे. परंतु त्यातूनही एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सर्वच पदाधिकार्यांनी आपली कामे चोख बजावली आहेत. रायगड जिल्ह्याला सुद्धा गेल्या वर्षीपासून तौत्के चक्रीवादळ, निसर्ग चक्रीवादळ, महापूर, आदी नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला आहे. या संपूर्ण परिस्थितीत सद्य जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी अत्यंत उत्कृष्ट प्रकारे परिस्थिती हाताळली, मात्र, तरीही त्यांची अचानकपणे त्या पदावरून उचलबांगडी केल्याने,आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यासोबतच इतरही काही शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
१ जानेवारी २०२० रोजी निधी चौधरी यांनी रायगड जिल्हाधिकारी पदाची धुरा स्वीकारली होती. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची बदली करून त्यांना मंत्रालयामध्ये माहिती तंत्रज्ञान संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तसेच, आता त्यांच्या जागी रायगडचे जिल्हाधिकारी पदी महेंद्र कल्याणकर काम पाहतील.
पाहूया अजून कोणकोणत्या अधिकाऱ्यांच्या कुठे झाल्या बदल्या !
रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना मुंबई येथे माहिती तंत्रज्ञान संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले असून त्यांच्या जागी रायगडचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी पदभार स्वीकारला आहे.
ठाणे येथे अतिरिक्त आदिवासी आयुक्त म्हणून एम. बी. वरभुवन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते आधी मंत्रालय जीएडी कनिष्ठ सचिव होते.
गडचिरोलीच्या जिल्हाधिकारीपदी संजय मीणा यांची बदली केली गेली आहे. त्यांनी ठाण्यातील अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहिले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सह-आयुक्त म्हणून बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहिलेले अजित कुंभार यांना नियुक्त करण्यात आले आहे.
विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर पदी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांना सदस्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
संजय दैने यांना हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे तर बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.