जिल्ह्यात दि. १८ डिसेंबर रोजी २२२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. निवडणुका जाहीर झाल्यानंतर, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसानंतर काही ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. त्यामुळे १५५ सरपंच आणि ६६६ सदस्यांच्या जागांसाठी ५०७ मतदान केंद्रांवर मतदान झाले. सरपंचपदासाठी ४०६ उमेदवार तर सदस्यपदासाठी १२०६ उमेदवार रिंगणात आहेत.
रविवारी सकाळी ७ ते सायंकाळी ५.२० वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडली. रत्नागिरी तालुक्यात केवळ एका ठिकाणी यंत्र बंद पडल्याची नोंद झाली होती. ते तत्काळ बदलण्यात आले. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५७.३१ टक्के मतदान झाले होते.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे सार्वत्रिक निवडणुकीत सरपंचपदाचे ४०६ उमेदवार तर सदस्यपदाच्या १२०६ उमेदवारांचे भवितव्य रविवारी मतपेटीत बंद झाले. निवडणुकीच्या कालावधीमध्ये दिवसभरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही त्यामुळे मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. दुपारी साडेतीनपर्यंत जिल्ह्यातील ११ लाख २३ हजार ४४० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून ५७.३१ टक्के मतदान झाले होते. सायंकाळपर्यंत ६६ टक्केपर्यंत मतदान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
जिल्ह्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना विरुध्द बाळासाहेबांची शिवसेना अशी चुरस निर्माण झाली आहे. रत्नागिरी आणि दापोली-खेड विधानसभा मतदारसंघात दोन्ही पक्षांतील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काही ठिकाणी भाजपकडूनही निवडणूक लढविण्यात आली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत मतपेट्या तालुक्याच्या ठिकाणी आणण्याचे काम सुरू होते. त्यासाठी वेळ संपल्यावर दिवसभरामध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला.
सुमारे २ लाख १५ हजार ३९९ मतदारांपैकी १ लाख २३ हजार ४४० मतदारांनी दुपारपर्यंत मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यात ६३ हजार ३२७ महिला तर ६० हजार ११३ पुरुष मतदारांचा समावेश आहे. सकाळच्या सत्रात देखील १० ते ११ वाजेपर्यंत जास्त आणि सायंकाळच्या सत्रात आठ ते दहा टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे.