गुहागर तालुक्यातील समुद्रकिनारी बऱ्याच प्रमाणात लहानसहान दुकाने, खोपट्या, स्टॉल अनधिकृत रित्या बांधल्याने समुद्रकिनाऱ्यावरील अनेक जागा बऱ्याच प्रमाणात व्यापून गेल्या आहेत. गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे पर्यटन उद्योग बंद होता. त्यामुळे गुहागर समुद्र किनार्यावरील सर्व्हे नं. ११४ सर्व अनधिकृत बांधकामे विना विलंब हटविणेत यावीत, अशी नोटीस महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या सहाय्यक बंदर निरीक्षक यांनी सुमारे २० व्यावसायिकांना दिली आहे. त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या व्यावसायिकांच्या दुकानांवर आता शासन बुलडोझर फिरविण्याची तयारी करत आहे, असे व्यावसायिकांकडून म्हटले जाते आहे.
अद्याप अतिक्रमणे हटवण्यात आलेली नाही आहेत. सदर अतिक्रमण दुकाने स्टॉल उभारण्यासाठी आपण मेरीटाईम बोर्डाची परवानगी घेतलेली नाही. तरी हे पत्र मिळाल्यापासून पाच दिवसांच्या आत आपण अनधिकृतपणे उभारलेली दुकाने हटवून त्याखालील जागा त्वरित रिकामी करून द्यावी. अन्यथा अतिक्रमण हटाव योजनंतर्गत ही अतिक्रमणे दूर करणेत येतील.
त्याचप्रमाणे यासाठी होणारा खर्च देखील आपलेकडूनच वसूल करण्यात येईल. अतिक्रमण हटवताना होणाऱ्या नुकसाणाची जबाबदारी हि सर्वस्वी आपली असेल, असे नोटिसमध्ये स्पष्ट नमूद करून महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे सहाय्यक बंदर निरीक्षक, पालशेत यांनी व्यावसायिकाना पाठविल्या आहेत.
त्यामुळे एक तर २ वर्षांनी सुरु झालेल्या पर्यटन व्यवसायाला मेरिटाइम बोर्डाकडून रोख लावली जात असल्याने व्यावसायिक सुद्धा हैराण झाले आहेत. आधीच आर्थिक संकटाचा डोक्यावर बोजा, त्यात जर जागासुद्धा गेली तर व्यवसाय तरी कसा करायचा! उत्पन्नाचे साधनच राहिले नाही तर कमवायचे कसे आणि खायचे काय! असा गहन सवाल व्यावसायिकांसमोर आ वासून उभा राहिला आहे.