हिमाचल प्रदेशातील धौलाधार आणि पीर पांजल रांगेच्या मध्यवर्ती असलेले, सर्वात उंच आणि अत्यंत अवघड माऊंट हनुमान तिब्बा हे ५ हजार ९८२ मीटर (१९ हजार ६२६ फूट) उंचीचे शिखर रत्नागिरीतील जिद्दी माऊटेनिअरिंगच्या अरविंद नवलेने सर केले. हे शिखर सर करणारा जिल्ह्यातील पहिला क्लायंबर्स ठरला. मोठ्या प्रमाणात पाऊस, बर्फवृष्टी, साधारण १००च्या गतीने वाहणारे हिमवारे, अंधुक प्रकाश, पाण्याची आणि ऑक्सिजनची कमतरता असे निसर्गाचे अवघड टप्पे त्यांनी पार केले. चढाई करताना पाच वेळा अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. हनुमान तिब्बा शिखर मोहिमेत अरविंदबरोबर मंगेश कोयंडे, अमोल आळवेकर, अरविंद नवेले, मोहन हुले हे चार क्लायबिंग सदस्य आणि विशाल ठाकूर, गोपाळ ठाकूर, भागचंद ठाकूर हे गाईड अशा ७ जणांनी शिखर माथा गाठण्याची कामगिरी ५ जुलैला केली.
मोहिमेतील एकमेव महिला सदस्य राजश्री जाधव-पाटील यांनी १६ हजार फुटांपर्यंत मजल मारली. त्यांना प्रेम ठाकूर (आचारी) यांचीही साथ मिळाली. या मोहिमेतील अवघड समजला जाणारा टेंटू पास टीमने लिलया पार केला. मोहिमेबाबत ‘सकाळ’शी सवांद साधताना अरविंद म्हणाले, २२ जून ते ६ जुलै या कालावधीत ही मोहीम पार पाडली. धोंदी गावातून प्रत्यक्ष चढाईला आरंभ झाला. खडतर अशा मार्गावर टेंट २ पास येथे आम्ही सुरक्षित ठिकाणी पोचलो आणि मागे अचानक हिमस्खलन झाले. नशीब जोरावर असल्यामुळेच आम्ही सुरक्षित राहिलो. चालताना दमछाक होत होती. प्रतिकूल वातावरणामुळे शेवटच्या टप्प्यात जेवण संपले.
सूप, मॅगी, चहा किंवा कॉफी यावर दिवस काढावा लागला. याचवेळी उलटीही झाली; पण अनुभव गाठीशी असल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण व्यवस्थित राखत शिरापर्यंत पोचलो. शिखरापासून काही अंतरावर ३ मार्ग दिसत होते. त्यातील दोन मार्ग काही अंतरावर जाऊन ब्लॉक झाले होते. तिसऱ्या मार्गावर ९० अंशातील एक चढ होता. तेथून शिखर सर करण्यात यश मिळाले. हा प्रवास रात्रीच्यावेळी केला. दिवसा बर्फ वितळून चालणे शक्य नव्हते. थंडीमुळे कडक झालेल्या बर्फातून चालणे त्यापेक्षा सोपे झाले. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याने संकटावर मात करत सुरक्षितरित्या शिखर गाठले; परंतु आमच्यानंतर शिखर चढाईसाठी गेलेल्या एका पथकाला दुर्घटनेला सामोरे जावे लागले.