यावर्षी १७ मार्च रोजी होलिकादहन आणि १८ मार्च रोजी धुलिवंदन आहे. या पार्श्वभूमीवर सणानिमित्त मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे सांगितले जात आहे. हे नियम बंधनकारकच आहेत. हे पाळले नाही तर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आदेश गृहमंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. होळी, धुळवडीसाठी राज्य सरकारची नवी नियमावली पुढीलप्रमाणे –
राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरु असल्याने रात्री उशिरा लाऊड स्पीकर जोरजोरात लावू नये.
सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होळी सणावेळी कोणताही डीजे लावण्यास परवानगी नाही. जर कोणी डी.जेचा वापर करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
होळी साजरी करताना मद्यपान करून बिभत्स व उद्धट वर्तन होणार नाही, याची काळजी घ्यावी. सर्वसामान्य जनतेस त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.
रात्री १० च्या आत होळी करण्यात यावी.
होळीच्या सणानिमित्त वृक्षतोड करू नये आणि केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
होळी सणानिमित्त जिल्ह्याच्या बाहेरून व इतरत्र येणाऱ्या महिलांची व मुलींची कोणीही छेड काढू नये. याबाबत मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दक्ष राहावे. सर्वस्वी जबाबदारी त्यांची असेल.
महिलांनी परिधान केलेले मौल्यवान दागिने आणि वस्तूंची काळजी घ्यावी. गर्दीचा फायदा घेणाऱ्या चोरांपासून सावध राहावे. होळी सणानिमित्त कोठेही आगी भडकतील असे कृत्य करू नये.
होळीच्या कार्यक्रमात कोणत्याही जाती धर्माच्या भावना दुखावल्या जातील, अशा घोषणा देण्यात देऊ नये. तसेच आक्षेपार्ह फलक/बॅनर लावण्यात येऊ नयेत.
होळी किंवा धुलिवंदनाच्या निमित्ताने कोणीही जबरदस्ती रंग, फुगे व पाण्याच्या पिशव्या अनोळखी कोणाच्याही अंगावर फेकू नये. रंगाचा बेरंग होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी.