दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने श्रीलंका टीमचा २३८ धावांनी दणदणीत पराभव केला आहे. याचबरोबर दोन सामन्यांची ही कसोटी मालिका २-० अशी खिशात घातली आहे. रोहीत शर्माच्या नेतृत्वाखाली यजमान भारतीय संघाने पिंक बाॅल कसोटीत पाहुण्या श्रीलंकेला तिसऱ्या दिवशीच धूळ चारली. श्रीलंकेला विजयासाठी ४४७ धावांचे लक्ष्य मिळाले होते. भारता कडून रविचंद्रन अश्विनने चार आणि बुमराहने तीन बळी घेतले. त्यामुळे अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने डेल स्टेनला पिछाडीवर टाकले आहे.
आयसीसीच्या विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या गुणतालिकेत भारतीय संघाने आता मोठी भरारी घेतली आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघ गुणांकनानुसार पाचव्या स्थानावर होता, त्यावेळी भारतीय संघाची विजयी टक्केवारी ही ४९.०७ एवढी होती. पण या विजयानंतर भारतीय संघाने गुणतालिकेत श्रीलंकेला मागे टाकत चौथे स्थानावर उडी घेतली आहे.
जसप्रीत बुमराहने पहिल्या डावात पाच विकेट आणि दुसऱ्या डावात तीन विकेट तर अक्षर पटेलने दोन बळी आणि रवींद्र जडेजाला एक विकेट मिळाली. पहिल्या डावात १०९ धावांवर बाद झालेल्या श्रीलंकेचा संघाची दुसऱ्या डावात केवळ २०८ धावांपर्यंतच मजल मारू शकला आहे. भारताचा घरच्या मैदानावर हा सलग १५ वा मालिका विजय आहे.
भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या अर्ध्या तासांतच श्रीलंकेचे चार गडी गारद केले. पहिल्या डावात संपूर्ण संघ १०९ धावांत गुंडाळला होता. पहिल्या डावाच्या जोरावर भारताला १४३ धावांची आघाडी मिळाली होती. दुसऱ्या डावात भारतीय संघाने ९ बाद ३०३ धावा करून डाव घोषित केला. अशाप्रकारे भारताची एकूण आघाडी ४४६ धावांची झाली होती.