प्रशासन अधिकाऱ्याच्या अहवालानुसार घनकचरा प्रकल्पासाठी आलेले पाचही प्रस्ताव नाकारल्याचे कागदोपत्री पुरावे कोत्रेवाडी ग्रामस्थांकडे असूनही गेले ३४ दिवस सुरु असलेल्या उपोषणाची प्रशासन दखल घेत नसेल तर ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. याबाबत येत्या दोन दिवसांत योग्य निर्णय न आल्यास प्रशासनाला योग्य धडा शिकवू असा इशारा शिवसेना नेते तथा गुहागरचे आमदार भास्करराव जाधव यांनी दिला आहे. लांजा कोत्रेवाडी येथील घनकचरा प्रकल्पाविरोधात गेले ३४ दिवस लांजा तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या कोत्रेवाडी ग्रामस्थांची शिवसेना नेते तथा आमदार भास्करराव जाधव यांनी मंगळवारी भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. १४ ऑगस्ट पासून उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांना मंगळवारी १६ सप्टेंबर रोजी ३४ दिवस पूर्ण झाले. तरी देखील उपोषण सुरू असून त्या उपोषणाला आ. भास्कर जाधव यांनी भेट दिली. यावेळी पुढे बोलताना ते पुढे म्हणाले की, कोत्रेवाडी ग्रामस्थ हे गेले ३४ दिवस उपोषणाला बसले असून गणपतीसारख्या सणाच्या दिवसांत देखील हे ग्रामस्थ उपोषणाला बसले होते. उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांची गेल्या ३४ दिवसांत साधी दखल देखील प्रशासन घेत नसेल आणि इतक्या बेजबाबदारपणे प्रशासन वागत असेल तर ते चुकीचे आहे.
कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याने उपोषणस्थळी न येणे, उपोषणाची दखल न घेणे हे कितपत योग्य आहे. एवढे अक्षम्य दुर्लक्ष प्रशासनाने करणे हे. अजिबात खपवून घेतले जाणार नाही. दरम्यान, यावेळी शिवसेना नेते तथा आमदार भास्करराव जाधव यांनी जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांना फोन करून याबाबत चौकशी केली असता जिल्हाधिकारी यांनी आ. भास्करराव जाधव यांना तत्कालीन मुख्याधिकारी तुषार बाबर यांना लेखी पत्र काढणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेश करंबळे, शहरप्रमुख मोहन तोडकरी, तालुका महिला संघटिका पूर्वा मुळे, माजी नगरसेवक लहू कांबळे, शिवसहकारचे जिल्हा समन्वयक परवेश घारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महंमद रखांगी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

