रत्नागिरी जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस आमदार डॉ. राजन साळवी, महाराष्ट्र राज्य प्रदेश कॉंग्रेस समितीचे राज्य समन्वयक प्रा. विनय खामकर, सदाशिव साळुंखे यांचेसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्ह्यात दळणवळणाच्या दृष्टीने उपयुक्त आणि पर्यायी मार्ग असलेल्या भांबेड ते गावडी, देवडे ते विशालगड आणि काजिर्डा ते पडसाळी या तीन घाट रस्त्यांच्या कामांचे प्राथमिक सर्वेक्षण करुन त्याचे अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी आज दिले आहे.
या बैठकीत रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील भांबेड-कोळेवाडी-मांजरे-गावडी जि. कोल्हापूर, संगमेश्वर तालुक्यातील देवडे-भोवडे ते विशालगड जि. कोल्हापूर, राजापूर तालुक्यातील मौजे काजिर्डा ते पडसाळी घाट या तीन घाट रस्त्यांबाबत विशेष लक्ष केंद्रित करून चर्चा करण्यात आली. दळणवळणाच्या दृष्टीने उपयुक्त आणि पर्यायी मार्गासाठी भांबेड ते गावडी या घाट रस्त्याचे काम प्राधान्याने हाती घेण्याच्या सूचनाही यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांनी दिल्या.
रत्नागिरी आणि कोल्हापूर हे दोन जिल्हे जोडणारे पर्यायी रस्ते भांबेड ते गावडी, देवडे ते विशालगड आणि काजिर्डा ते पडसाळी हे आहेत. येत्या अर्थंसंकल्पात या घाट रस्त्यांच्या सर्वेक्षण आणि भूसंपादनासाठी तसेच सविस्तर प्रकल्प अहवालासाठी निधीची तरतूद करण्याचे निर्देश देतानाच या तीनही घाट रस्त्यांच्या कामाचे प्राथमिक सर्वेक्षण करण्याचे निर्देशही यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांनी दिले. रत्नागिरी जयगड पोर्ट ट्रान्सपोर्टस युनियनच्या वतीने अध्यक्ष रमेश कीर यांनी अतिवृष्टीमुळे रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबाघाट अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला असून, तो लवकरात लवकर खुला करण्याची मागणी यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्र्यांकडे केली आहे.