रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर, चिपळूण, खेड आणि राजापूर या तालुक्यांमध्ये २२ आणि २३ जुलै रोजी आलेल्या महापूरामुळे शासकीय मालमत्तेचे सुमारे ३८ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रथमदर्शनी अतिवृष्टीमुळे १७८७ हेक्टर शेती क्षेत्राचे नुकसान झाले असून नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे कृषि विभागाकडून वेगवान गतीने करण्यात येत आहेत. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्रातील ३७३९ दुकानांचे आणि ३७३२ वाहनांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.
अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या ४४ गावांतील ११२२ कुटुंबांना ११२.२० क्विंटल गहू आणि तांदळाचे वाटप करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे २४ गावांतील २०६ कुटुंबांना १०३० लिटर रॉकेलचे वाटप सुद्धा करण्यात आले आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या १७ हजार ५७४ लोकांना शिवभोजन थाळीद्वारे अन्नाचा पुरवठा करण्यात येत आहे. पूर ओसरल्यानंतर सर्वत्र झालेल्या चिखल आणि घाणिचे साम्राज्य हट्विण्यासाठी २० जेसीबी, २१ डंपर, ५ ट्रॅक्टर, ५ बस, २५ टँकर, १५ ट्रक इत्यादिची मदत घेउन स्वच्छता करण्यात येत आहे. पूरामध्ये मृत झालेल्या जनावरांची देखील विल्हेवाट लावण्यात येत आहे. पूरग्रस्त भागातील कचरा गावाबाहेरील खाणीमध्ये टाकून त्याची विल्हेवाट लावण्यात येत आहे. तसेच नगरपालिका निर्जंतुकीकरण करण्यासाठी अन्य पथके कार्यान्वित केली आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील तसेच पुणे, जळगाव, लातूर, मुंबई उपनगर, ठाणे इत्यादी जिल्ह्यांतील व्यक्ती, सामाजिक संस्था, उद्योगपती, व्यापारी यांनी मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाण्याच्या बॉटल्स, तयार अन्नाची पाकिटे, धान्य, कपडे, भांडी, रोजच्या वापरातील आवश्यक वस्तूंचे किट, औषधे इत्यादी आवश्यक वस्तूंचे वाटप केले. मध्यंतरी पूरग्रस्तांसाठी येणाऱ्या मदतीचा फायदा कोणीतरी तिर्हाइतच घेत आहेत, अशी व्रुत्त मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने, आलेली मदत आणि साहित्य वितरित करण्यासाठी नियोजन करण्यात आले असून खेड आणि चिपळूण येथील एकूण ५ ठिकाणी मदत साहित्य एकत्रित करुन ज्या ठिकाणी मदत पोहोचत नाही, अशा भागांमध्ये वितरित करण्यात येत आहे. काही ठिकाणी घरोघरी जाऊन सुद्धा मदतरुपी वस्तुंचे वाटप करण्यात आले.