६ फेब्रुवारीला गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या झालेल्या निधनानंतर त्यांचे अंतिम संस्कार शिवाजी पार्क दादर येथे पार पडले. जसे बाळासाहेब ठाकरेंचे तिथे स्मारक बांधण्यात आले तसेच लता मंगेशकर यांचेही बांधण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. या स्मारकावरुन आता राजकारण सुरु झाल आहे. लतादीदींचे स्मारक शिवाजी पार्कात व्हावे, अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करत लतादीदींच्या स्मारकावरुन सुरु असलेल्या वादात उडी घेतली आहे. शिवाजी पार्क मैदानाचा राजकारणासाठी बळी देऊ नका अशी भूमिका मनसेनं घेतलीय. शिवाजी पार्क मैदान हे खेळासाठी आहे, त्यामुळे त्यावर अतिक्रमण नको असं मनसेनं म्हटलंय.
मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले, बाळासाहेब, लतादीदी हे स्वत: क्रीडाप्रेमी होते. त्यांची देखील मैदाना बाबतची भूमिका स्पष्ट असती त्यांनाही हे सगळं आवडलं नसते. छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे मैदान दादर वासियांनी खेळण्यासाठी अनेक वेळा संघर्ष करून अतिक्रमणापासून वाचवलं आहे. तुमच्या राजकारणासाठी त्याचा बळी देऊ नका ही विनंती.
मनसेचा लतादीदींच्या स्मारकाला विरोध असल्याचे दिसत आहे. लतादीदींचे स्मारक व्हावे परंतु दुसऱ्या ठिकाणी करण्यात यावे अशी काहींची मागणी आहे. व्हीआयपी लोकांच्या अंत्यविधीसाठी शिवाजी पार्क मैदानाचा वापर करण्यात येत असून, ते पार्क खेळण्यासाठी असून यासाठी अनेकवेळा संघर्ष केला आहे. त्यामुळे राजकारणासाठी त्याचा बळी देऊ नका अशी विनंती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. मुंबईत खेळासाठी मोठे असे एकच मैदान उरले असून ते शिवाजी पार्क आहे. यामुळे राज्य सरकारने शिवाजी पार्कमध्ये स्मारक न उभारता पर्यायी जागेवर स्मारक करा अशी मागणी केली जात आहे.