जिल्ह्यात २०२१-२२ मध्ये निर्यातक्षम आंबा बागांची मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली आहे. ही नोंदणी ५ वर्षासाठी वैध आहे. त्यामुळे गतवर्षी नोंदणी केलेल्या आंबा बागांची नव्याने नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. २०२२-२३ या वर्षासाठी नव्याने नोंदणी करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज, सात-बारा, आठ ‘अ’, बागेचा नकाशा इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. मँगोनेटद्वारे नोंदणी करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२३ पर्यंत आहे. युरोपियन युनियन आणि इतर देशांना आंबा निर्यातीकरिता कृषी आणि प्रक्रिया खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणच्या (अपेडा) मँगोनेट प्रणालीद्वारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी केली जाते.
निर्यातीसाठी ‘मँगोनेट’वरील नोंदणी अत्यावश्यक आहे. गेल्या दहा वर्षात रत्नागिरी जिल्ह्यातील सात हजाराहून अधिक आंबा बागायतदारांनी परदेशी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी ३१ मार्च २०२३ पर्यंत नोंदणी करायची असून ४० बागायतदारांनी प्रतिसाद दिला आहे.
जिल्ह्यातील सर्व आंबा बागायतदारांनी निर्यातक्षम बागांची नोंदणी करण्याकरिता आपल्या कार्यक्षेत्रातील तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून विहित मुदतीत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे यांनी केले आहे. निर्यात करणाऱ्या आंबा बागायतदारांची जिल्ह्यातील संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरवर्षी हजार बागायतदार नोंदणी करतात. गतवर्षी १६४३ बागायतदारांनी वर्षभरात नोंदणी केली होती.
मँगोनेटवर बागायतदारांसह निर्यातदार, परदेशातील दर, तेथील विक्रेते यांचीही माहिती अपलोड केली आहे. कुवेत, रशिया, इंग्लंड, स्विडन, युरोपिअन युनिअन, ऑस्ट्रेलिया, जपान, कॅनडा, मॉरेशिअस, न्युझिलंड, दुबई आणि आखाती देशांमध्ये हापूस पाठवला जातो. यातील काही देशांना पाठवण्यात येणाऱ्या फळावर प्रक्रिया करावी लागते. त्याचे निकष, फळाचे वजन निश्तिच केले आहेत. त्याचा दर्जाही राखावा लागतो. सेंद्रिय फळाला परदेशात मागणी असल्याने मँगोनेट प्रणाली बागायतदारांसाठी वरदान ठरली आहे.