सागरी क्षेत्रात भारतीयांना कौशल्य पूर्वापार आहे; परंतु पारतंत्र्याच्या काळात आपल्याला त्याचा विसर पडला आहे. आता पुन्हा नव्याने ओळख करून घेऊन काम करणे आवश्यक आहे. यात भरपूर संधी उपलब्ध आहेत. समुद्री विज्ञान, संशोधन, सागर सुरक्षा याबाबत काम करायचे आहे. समुद्रातून संरक्षणच नाही, खनिज संपत्ती, मासेमारी, समुद्रमार्गे वाहतूक अर्थव्यवस्था अवलंबून आहे. या साऱ्यातून भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन होणार आहे, असे प्रतिपादन भारतीय नौसेनेचे कमोडोर श्रीरंग जोगळेकर (निवृत्त) यांनी केले. आसमंत बेनवोलन्स फाउंडेशनतर्फे आयोजित द्वितीय सागर महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या वेळी जोगळेकर म्हणाले, जगातले काही देश फक्त समुद्रावरच अवलंबून आहेत.
त्यांची अर्थव्यवस्था त्यावरच चालते. भारताला लाभलेल्या सागरी ताकदीचा उपयोग करून घेतला पाहिजे. समुद्रातील खनिजसंपत्ती, तेल, कोरल्स संशोधनासाठी मोठी संधी आहे तसेच समुद्रात प्लास्टिक व अन्य प्रदूषण होऊ नये म्हणून काम केले पाहिजे. या वेळी मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुरेश नाईक, एनआयओ संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. नरसिंह ठाकूर, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, आसमंतचे संस्थापक संचालक नंदकुमार पटवर्धन उपस्थित होते. डॉ. सुरेश नाईक म्हणाले, समुद्राचे जग वेगळे आहे. त्यात विविध प्राणी, वनस्पती, डोंगरदऱ्या आहेत.
आसमंतने आयोजित केलेल्या या महोत्सवाची संकल्पना खुपच सुरेख असून, यापुढे नेहमी मत्स्य महाविद्यालय आपल्यासोबत आहे. यंदा आमचे विद्यार्थी थायलंड व अन्य देशांत अभ्यास दौऱ्यावर जाऊन आले. त्यांना समुद्रीजगातील घडामोडी समजल्या. आपणही समुद्री उपक्रमांत सहभागी झाले पाहिजे. आसमंतचे संस्थापक नंदकुमार पटवर्धन म्हणाले, आसमंत फक्त पर्यावरण, निसर्ग यासाठी जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहे. डॉ. नुलकर यांच्याशी चर्चेनंतर सागर महोत्सव सुरू झाला. हे दुसरे वर्ष असून, पर्यावरण जागृतीसाठी हा महोत्सव उपयुक्त ठरत आहे.