रत्नागिरीमध्ये सध्या अनेक घातक गोष्टी घडत आहेत. मंडणगडमध्ये शस्त्रधारी लोक खाडीकिनाऱ्यामध्ये निदर्शनास आले असून, आता बुधवार ६ ऑक्टोबर रोजी पहाटे ४.४० च्या दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे पुणे येथील फॉर्च्युनर गाडीतून विना परवाना ४८ हजार ५०० रुपयांचे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि ५ जिवंत राउंड घेउन जाणार्या दोघांना ग्रामीण पोलिसांनी अटक करण्याची कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे प्रेम वर्मा अलकुंटे आणि सागर कुमार अलकुंटी दोघेही राहणार हडपसर, पूणे अशी आहेत. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस हेड काँस्टेबल प्रविण खांबे यांनी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. बुधवारी पहाटे हे दोघेही आपल्या ताब्यातील फॉर्च्युनर गाडीमधून हातखंबा येथील शांती ढाब्यासमोरुन जात होते, त्यावेळी ग्रामीण पोलिसांनी त्यांच्या गाडीची झडती घेतली.
या झडतीमध्ये प्रेम अलकुंटे याच्याकडे विनापरवाना गावठी बनावटीचे पिस्तुल आणि ५ जिवंत राउंड मिळून आले असून, बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही एक दिवसाची पोलिस कोठडीची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनकर सुर्य करत आहेत.
प्रेम अलकुंटे याच्याकडे विनापरवाना गावठी बनावटीचे पिस्तुल आणि ५ जिवंत राउंड मिळाल्याची माहिती मिळाल्यानंतर अनेक उलट सुलट तर्कवितर्कांना उधाण आले होते. नक्की हि व्यक्ती कशासाठी रत्नागिरीच्या दिशेने आली होती! त्यामध्ये सोबत असणारे पिस्तुल नक्कीच संशय निर्माण करते आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील फॉर्च्युनर गाडीसह, पिस्तुल आणि ५ राउंड ताब्यात घेतले असून, पुढील कारवाई सुरु आहे.